| अलिबाग | प्रमोद जाधव |
आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आपदा मित्रांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 300 आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते आपदग्रस्तांसाठी वरदान ठरत आहेत.
निसर्ग चक्री वादळाबरोबरच तौक्ते चक्री वादळाच्या मोठ्या हानीनंतर स्थानिकांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपदा मित्रांची निवड करण्याचा निर्णय घेतला. 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंतच्या मंडळींना आपदा मित्रामध्ये सामावून घेण्यात आले. या उपक्रमाला जिल्ह्यातून शेकडो तरुणांचा सहभाग मिळाला. त्यात 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी सहभाग घेऊन आपदा मित्र होण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात 300 आपदा मित्रांची निवड करण्यात आली. त्यांना महाड, माणगाव, पनवेल, पेण या ठिकाणी प्रशिक्षण देऊन आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्याचे धडे दिले. अतिवृष्टीत अथवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत गरजुंना मदत करण्याबरोबरच आपदग्रस्तांना अधार देण्याचे काम त्यांच्यामार्फत केले जात आहे. यामध्ये पुरुषांसह महिलांदेखील सहभाग आहे.
विनामुल्य स्वयंसेवक म्हणून बजावतात भुमिका प्रशासनाच्या सोबत आपत्कालीन परिस्थिती काम करण्यासाठी आपदा मित्र नेण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण मंडळी सहभागी झाले आहेत. विनामुल्य स्वयंसेवक म्हणून ही मंडळी सेवा देत आहेत. अतिवृष्टीच्या काळात तसेच महाड येेथे 20 मार्चला क्रांतीदिनी आंबेडकर अनुयायींच्या मदतीसाठी चवदार तलाव परिसरात यांची निवड केली जात आहे.
आपत्कालीन परिस्थितीत समस्या सोडविण्यासाठी स्थानिकांचा हातभार महत्वाचा असतो. त्यामुळे प्रशासनाने आपदा मित्रांची निवड केली आहे. 300 अपदा मित्रांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रात्यक्षिक धडेदेखील देण्यात आले आहेत.
सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड