| पेण | प्रतिनिधी |
महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. या निमित्ताने महिला किसान अधिकार मंच ( मकाम) या राष्ट्रीय मंचामार्फत अभियान राबविण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून पेण तालुक्यातील जुलै महिन्यातील दरडग्रस्त, अतिवृष्टीत वनहक्क मान्यताप्राप्त जमीनीवर झालेल्या नुकसानाबाबत आदिवासी शेतकरी महिलांनी शासनाचे लक्ष वेधून स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. या बाबत माहिती देताना जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील म्हणाल्या
दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यासंबंधीचा ठराव 2007 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने संमत केला. या ठरावात ग्रामीण विकास, अन्न सुरक्षा आणि गरिबीचे निर्मूलन यात ग्रामीण महिलांचे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले. आपल्या देशात हा दिवस ‘राष्ट्रीय महिला शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिन साजरा करताना आपल्याकडे कर्तबगार ग्रामीण स्त्रियांचा सत्कार वगैरे कार्यक्रमांचे आयोजन होते खरे, मात्र त्यापलीकडे पोहोचत महिला शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी पुरेशी पावले धोरण स्तरावर उचलली जाणे अत्यावश्यक आहे, असे साजाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी सांगितले.
दुर्देवाने वनहक्क मान्यताप्राप्त जमीनधारक आदिवासी शेतकरी महिलांना अद्याप सातबारा देण्यास सरकार अपयशी ठरल्यामुळे नुकसान भरपाई मिळालेली नाही. या बाबत महिला किसान दिनी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. सोमवारी याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याची माहिती अंकुर ट्रस्ट चे सोपान निवळकर व आशिष सावंत यांनी दिली.