कासव संवर्धनासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील; पालकमंत्री
दिवेआगर येथे कासव महोत्सव संपन्न
पर्यटकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
। गणेश प्रभाळे । दिघी ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या प्रसिद्ध पर्यटनस्थळी आता कासव संवर्धन चळवळ रुजत आहे. येथे दुर्मिळ होत असलेल्या ऑलिव्ह रिडले या कासव प्रजातीच्या संवर्धनाच्या दृष्टीने समुद्रकिनारी रविवारी कासवांच्या पिल्लांना समुद्रामध्ये पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सोडण्यात आले. कासवांच्या दुर्मिळ होत असलेल्या प्रजातींचे संवर्धन होण्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तर, समुद्री कासवांचे संरक्षण व संवर्धनास सध्या गती मिळाली आहे.

दिवेआगर येथे शासनाच्या प्रयत्नासह स्थानिकांचा पुढाकार मिळत आहे. कारण दिवेआगर समुद्रकिनारा हा कासवांच्या मादीला अंडी घालण्यासाठी नेहमीच सुरक्षित असलेला किनारा असून, मागील 60 दिवसांपूर्वी ऑलिव्ह रिडले या कासव मादीने 118 अंडी घालून त्याचे वनविभाग श्रीवर्धन, ग्रामपंचायत दिवेआगर, कांदळवन दिवेआगर, सह्याद्री निसर्ग संस्था यांच्या वतीने घरटी तयार करून अंड्याची जोपासना करण्यात आली. पुढे 60 दिवसांनंतर यातून पिल्ले बाहेर आली. या पिल्लांना रविवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत समुद्रामध्ये सोडण्यात आले.
यावेळी दिवेआगर सरपंच उदय बापट, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, वनक्षेत्रपाल श्रीवर्धन मिलिंद राऊत, वनपाल बोर्ली पंचतन सुनिल गुरव, वनरक्षक बोर्ली पंचतन दिनेश गिर्हाने, वनरक्षक शेख बुरान शेख इसा, सुवर्ण गणेश देवस्थान संस्था अध्यक्ष महेश पिळणकर, कांदळवन संस्थेचे सिद्धेश कोसबे, दिवेआगर पर्यटन संस्था अध्यक्ष लाला जोशी, ग्रामपंचायत सदस्य राकेश केळसकर, कासव रखवालदार मंगेश पडवळ, संतोष गुरव, पर्यटक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवेआगर समुद्र किनारी वनविभाग रोहाच्या वनक्षेत्र श्रीवर्धन त्याचप्रमाणे ग्रामपंचायत दिवेआगर, सह्याद्री निसर्ग संस्था, कांदळवन संस्था दिवेआगर व कासव मित्र यांच्या माध्यमातून आतापर्यंत 650 अंड्यांची जोपासना करण्यात आली आज त्यातील 118 पिल्लांना समुद्रामध्ये सोडण्यात आले.
कासवांच्या काही प्रजाती दुर्मिळ होत चालल्या असून, यावर जनजागृती करीत दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने विविध संस्था कार्य करीत आहेत. शासनाच्या वतीने देखील आवश्यक सहकार्य करण्यात येत आहे. – अदिती तटकरे, पालकमंत्री