| पनवेल | वार्ताहर |
नजीकच्या काळात अनैतिक संबधातुन जन्माला आलेल्या नवजात बालकाला फेकून देण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. नको असलेली गर्भधारणा त्यातुन जन्माला येणाऱ्या बालकाच्या भविष्यासह असंख्य प्रश्नावरून अनेक माता हा निर्णय घेत असतात. मात्र असे न करता या नवजात बालकाला काही संस्थांच्या ताब्यात देऊन आपण या बालकाला जीवनदान देऊ शकता. विशेष म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातुन देखील याकरिता काही टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात महिला व बालविकास विभाग, बालकल्याण समिती, वात्सल्य ट्रस्ट यांच्यासह पोलीस आदी. सर्व यंत्रणांकडून नवजात अर्भकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम केले जात आहे. पनवेल परिसरात मागील वर्षभरात जवळपास दहा नवजात बालके सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. एखाद्या घटनेत मूल नको असल्यास व जन्म द्यावा लागला व त्यानंतर पालनपोषण करण्यास असमर्थ असल्यास, संबंधितांनी त्याबाबतची माहिती वात्सल्य ट्रस्ट अथवा महिला बाळ कल्याण विभागाला दिल्यास, अशा व्यक्तींची नावे गोपनीय ठेवून नवजात बालकांच्या पालन पोषण तसेच शिक्षणाची जबाबदारी या संस्था घेतात. वात्सल्य ट्रस्ट मार्फत आजवर अनेक बालकांना दत्तक घेऊन त्यांची शिक्षण तसेच संपूर्ण जबाबदारी पार पाडण्यात आली आहे. या संस्थांशी संपर्क साधायचे झाल्यास 022 – 2775 3689 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
जिल्ह्यात जिवंत अर्भक सापडल्याच्या घटनांमध्ये अज्ञात महिला, मातेविरुद्ध यापूर्वी अनेक प्रकरणामध्ये गुन्हाही दाखल केला आहे. तसेच अर्भक मृत आढळल्यास याबाबतसुद्धा गुन्हा दाखल केला जातो. मागील दोन महिन्यापूर्वी पनवेल मधील पळस्पे गाव जवळ नदीत नवजात अर्भक फेकून देण्याचा प्रकार पुढे आला होता. बालकल्याण समितीकडे याबाबतची माहिती आल्यानंतर तीसुद्धा गोपनीय ठेवली जाते.
अलिबाग स्थित वात्सल्य ट्रस्टसोबत देखील थेट संपर्क साधून नवजात बालक या ट्रस्टला सुपूर्द करू शकतो अशी माहिती रायगड महिला बालकल्याण समितीचे अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीला देखील अशावेळी संपर्क साधता येऊ शकतो. याकरिता 112 हा टोलफ्री क्रमांक दाबून आपण या प्रणालीशी संपर्क साधु शकतो.
नवजात बालकाला फेकून न देता काही संस्थांना देखील सुपूर्द करता येते. या संस्था या बालकाच्या संपुर्ण पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारत असतात. याकरिता वात्सल्य सारखी संस्था रायगड मध्ये कार्यरत आहे. अलिबाग शहरात या संस्थेचे कार्यालय आहे. या संस्थेकडे आपले नवजात बालक सुपूर्द केल्यास संबंधितांचे नाव देखील गुप्त ठेवले जाते.
अशोक पाटील
अधिकारी, जिल्हा महिला बाल कल्याण विभाग