चवदार तळे सत्याग्रहाला 98 वर्षे पूर्ण
| महाड | प्रतिनिधी |
चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज दिवशी 98 वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीची सुरुवात महाडच्या ऐतिहासिक भूमीतून केली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ व रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे अभिवादन केले. यावेळी हेलिकॉप्टरमधून चवदार तळ्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी पोलीस दलाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देण्यात आली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री गोगावले यांनी चवदार तळ्याच्या 100 व्या वर्धापन दिनाची तयारी याच वर्षी केली जाणार असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठी एकत्रित बैठक करणार असल्याचे सांगितले. मंत्री संजय शिरसाठ यांनी चवदार तळ्याचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी फिल्टरेशन प्लांट व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून शंभराव्या वर्धापन दिनाच्या आधीचकरण्यात येईल, असे आश्वासित केले आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्ताने महाडमध्ये भीमसैनिकांनी लाठ्याकाठ्या या पारंपरिक शस्त्रांचे खेळ सादर केले. महाड शहरातून चवदार तळ्यापर्यंत भव्य मिरवणूकदेखील काढण्यात आली आहे. दरम्यान, भीमसैनिक आणि आंबेडकरी अनुयायांनी हजारोंच्या संख्येने चवदार तळ्यावर उपस्थिती दर्शवत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.