सतत पडणार्‍या पावसामुळे सुतारवाडी धरण तुडुंब

सुतारवाडी | वार्ताहर |
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पडणार्‍या पावसामुळे सुतारवाडी येथील धरण पाण्याने तुडुंब भरले असून, ओसंडून वाहत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून गायब झालेल्या पावसाने रविवार, दि. 11 जुलैपासून जोरदारपणे आगमन केल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर ऊन पडत होते, त्यामुळे लावणी केलेली भाताची रोपे करपण्याच्या अवस्थेत असताना पुन्हा एकदा पावसाने जोरदारपणे सुरुवात केल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. सुतारवाडी आणि दशक्रोशितील लावणीची कामे उरकली असून, आता पाऊस नियमित हवा आहे. गेल्यावर्षी जून महिन्यापासूनच पावसाने चांगल्या प्रकारे सुरुवात करीत ऑक्टोबरअखेरपर्यंत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे भातशेती चांगली पिकून उत्पादनही चांगले मिळाले होते. मात्र, कोरोनाने थैमान घातले होते, त्यामुळे अनेक जण चिंतेत होते. त्याचप्रमाणे 3 जूनला चक्रीवादळाने अनेकांचे मोठे नुकसान झाल्याने जनता हवालदिल झाली होती. यावर्षीही पाऊस नियमितपणे पडून उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा बळीराजाने व्यक्त केली.

Exit mobile version