श्रीवर्धनवासिय त्रस्त, ठेकेदाराने उपाययोजना करण्याची मागणी
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धनवासियांना रानवली पाझर तलावाजवळच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, त्या ठिकाणाहून श्रीवर्धन शहरापर्यंत नवीन जलवाहिनी टाकून झाली आहे. तर शहरातील अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. सदरच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी जेसीबीद्वारे अनेक ठिकाणी खोदकाम केले जात आहे. जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर त्यावरती पुन्हा माती पसरून खोदकाम केलेले बुजवण्यात येत असून, सदर बुजवलेल्या मातीवरती पाणी मारण्यात येत नसल्यामुळे श्रीवर्धन शहरातील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, नवीन जलवाहिन्यांची जोडणी प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत करताना रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यात आलेले असून, यामध्ये खडी टाकण्यात आली असली तरीही, दुचाकी चालवताना मोठ्या प्रमाणावर ती दणका बसतो. त्यामुळे अनेकांना कमरेचे आजार व खांद्याचे आजारदेखील उद्भवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठेकेदाराने जोपर्यंत काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत माती वरती पाणी मारून धुरळा उडणार नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. व ज्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे अशा ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी विराज लबडे यांनी देखील या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी श्रीवर्धन मधील नागरिकांकडून केली जात आहे