| तळा | वार्ताहर |
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला राज्यकारभार गड किल्ल्यावरून केला. अशा या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे, असे विचार दुर्गप्रेमी सुखद राणे यांनी व्यक्त केले. ते जी.एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळाचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिरात किल्ले स्वच्छता व संवर्धन या विषयावर व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे पुरुषोत्तम मुळे, युवा कवी श्रेयस रोडे, प्राध्यापक मोहिरे, एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. विवेक राणे, प्रा. डॉ. एन.एम. शेख, प्रा. ममता कुंडे उपस्थित होते.
शिवाजी महाराजांनी अनेक शूर मावळ्यांच्या सहकार्यातून रयतेसाठी राज्य करताना गड किल्ल्यांना महत्त्व दिले. रायगडसह महाराष्ट्रातील अनेक किल्ले महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहेत. अशा या पावन ऐतिहासिक वास्तूचे आपण जतन करून संवर्धन केले पाहिजे. यासाठी युवा पिढीने पुढाकार घेतला पाहिजे.
रायगडमधील जवळपास 59 किल्ल्यांची माहिती देताना, शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग सांगताना, प्रतापगडावरील अफजलखान भेट, लाल महालातील शाहिस्तेखान यांचा प्रसंग तर आग्र्याहून महाराजांची सुटका यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगावर भाष्य करून महाराष्ट्र सह देशभरात अनेक ठिकाणी गड किल्ल्यांसाठी भटकंती केलेली सांगून महाराजांचे काळातील किल्ल्यांचे महत्त्व सांगितले. तर स्वतः लिहिलेले ‘इये देशीचे दुर्ग’ हे गड किल्ल्यांचा इतिहास सांगणारे पुस्तक लवकरच प्रकाशित करणार आहे असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक ऐतिहासिक प्रश्न विचारले त्यांना सुखद राणे यांनी समर्पक उत्तरे देत युवा पिढीला गड संवर्धनासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन केले.