| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या बहुतांशी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, लहान-मोठ्या अपघातांबरोबर वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. दैनंदिन त्रासामुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रवासी, वाहन चालक कमालीचे नाराजीचे झाले आहेत. त्यातच खालापूर तालुक्यातील ग्रामीण माणकीवली-शेणगाव मार्गाची चाळण झाल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरल्याने या धुळीमय वातावरणातून पुढील मार्ग शोधणे सर्वांनाच जिकिरीचे बनल्याने नागरिक धुळीने हैराण झाल्याने संताप व्यक्त करीत आहेत.
या मार्गाला सन 2017 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून लाखो रुपयांचा निधी वापरून हा रस्त्याचे नुतनीकरण केले होते, परंतु या रस्त्यावरून रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अती वजनी वाहन ये-जा करीत असल्याने या रस्त्याची अवस्था अक्षरशः चाळणमय झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आधीच हा रस्ता अरुंद त्यात खड्ड्यांचे साम्राज्य, मोठी कसरत करून नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. तर या मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने असंख्य वाहन चालक, प्रवासी, पादचारी वर्गाला श्वसनाचा त्रास होत असल्याचे याठिकाणी पाहावयास मिळत असून संबंधित प्रशासनाने यावर उपाययोजना राबवून खडी मशीन चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.