रेशन कार्डधारकांना पुरवठा अधिकार्यांचे आवाहन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप केले जाते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण ई-केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिधाधारकांनी 15 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. अन्यथा धान्य बंद होईल, असे सांगण्यात आले आहे.
लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्यासाठी गावोगावी शिबीर आयोजित केले आहे. शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे. ही प्रक्रिया दि. 15 फेब्रुवारीपर्यंत करावयाची आहे. मुदतीमध्ये ई-केवायसी केले नाही, तर 15 फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही. 15 फेब्रुवारीपूर्वी शंभर टक्के केवायसीचे काम पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.
15 तारखेपूर्वी धान्य वाटप होणार
रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी महिना संपत आला, तरी धान्य ग्राहकांना मिळत नसल्याच्या तक्रारी कायमच आहेत. आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेस अन्नदिन साजरा करुन लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जाणार आहे. दर महिन्याच्या 15 तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावे, अशा सूचना जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दुकानात जाऊन केवायसी करावी
शासनाने वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानातून अन्नधान्याची उचल करू शकतात, अशी व्यवस्था केली आहे. त्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकांनी ई-केवायसी केली नाही, त्यांनी तातडीने करून घ्यावी अन्यथा त्यांना त्यांच्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन केवायसी करावी.
‘या’ कामगारांना मिळणार शिधापत्रिकेचा लाभ
केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत, असंघटित कामगार ज्यांच्याकडे अद्याप रेशनकार्ड नाही, अशा कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेंतर्गत तातडीने शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरित, असंघटित कामगारांना उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्याची कार्यवाही जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये सुरु आहे. त्यानुसार ज्या व्यक्तीनी स्वतःचे नाव ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत केलेले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकेचा लाभ नाही, अशा व्यक्तींनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जवळच्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क करुन शिधापत्रिका प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.