महावितरणला खांब हटवण्यास वेळ मिळेना
| वेनगाव | वार्ताहर |
कर्जत शहरातील आमराई तेथील रहदारीच्या रस्त्यावर विद्युत खांब लटकल्याच्या अवस्थेत काही दिवसांपासून तसाच आहे. त्यामुळे तेथून जाणाऱ्या वाहनचालक व रहिवाशांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असून, मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसाळ्यात शहरातील आमराई येथे मुख्य रस्त्यावरील विद्युत खांब नादुरुस्त होऊन रस्त्याच्या बाजूला झुकला आहे. त्या ठिकाणी दुसरा खांब आणून उभा करण्यात आला आहे. मात्र, अगोदरचा नादुरुस्त झालेला जुना खांब त्याच ठिकाणी बसवण्यात आलेल्या नवीन विद्युत खांबाला लटकवून ठेवला असून, तो अद्याप हटवण्यात आलेला नाही. त्यामुळे तेथून जाणाऱ्या तेथील नागरिकाला व वाहनचालकांना एक प्रकारच्या भीतीच्या सावटाखालून जावे लागत आहे. जर विद्युत खांब पडला, तर मोठी दुर्घटना होऊन वित्त, जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तरी, सदरचा लटकत असलेला विद्युत खांब महावितरण कंपनीने त्वरित हटवा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.