कामाच्या वेळात कर्मचारी गायब

शासकीय कार्यालयात ना येण्याची वेळ, ना जाण्याची वेळ

| उरण | वार्ताहर |

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा होऊनही कामकाजाच्या वेळी अनेक जण दांडी मारत आहेत. शासकीय अनेक कार्यालये असून, त्यात दुपारनंतर अनेक टेबलवरील कर्मचारी गायब असतात. याबाबत विचारणा केली असता, ते कर्मचारी ‘दौर्‍यावर’ गेल्याचे सांगण्यात येते.

शासकीय कर्मचार्‍यांना पाच दिवस कामकाजाचे करण्यात आले असूनही अनेकजण कामाऐवजी बाहेरच असतात. याबाबत माहिती घेतली असता, सकाळी येताना अनेकजण उशिरा येतात, तर दुपारी बाहेर गेलेले अनेक कर्मचारी दुसर्‍या दिवशीच कार्यालयात येत असल्याचे समजले. अनेक खातेप्रमुखही मुख्यालयात न राहता ते आपल्या गावावरून येत आहेत. यामुळे त्यांचे कार्यालयावर नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.

शासनाने कामाला गती येण्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळा वाढवून पाच दिवसांचा आठवडा केला. सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 या वेळात शासकीय कार्यालये सुरू राहावे, असे स्पष्ट आदेश आहेत; परंतु शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांकडून निर्धारित वेळेचे बंधन पाळले जात नाही. शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी अजूनही जुन्याच पद्धतीने कामकाज चालवीत आहेत. सकाळी 11 वाजताच्या पुढे येतात आणि 4 वाजताच गायब होतात. यातही उपस्थितीच्या वेळात विविध कारणे सांगून हे कर्मचारी खुर्चीवर राहात नाहीत. या कर्मचार्‍यांत कधीच वेळेचे गांभीर्य आणि शिस्तपालन होत नसल्याचेच पाहायला मिळते. कामासाठी वारंवार कार्यालयात चकरा मारून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, या कर्मचार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी उपाययोजना करावी अथवा सहा दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी आता सामान्य जनतेतून होत आहे.

रजिस्टर नावालाच
शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांना कामकाजाच्या वेळेत कार्यालय सोडावयाचे असेल तर त्याची रजिस्टरमध्ये नोंद आवश्यक असते. मात्र, मध्यवर्ती शासकीय कार्यालयातील रजिस्टर नावालाच असून, त्याचा वापर दिसून येत नाही. बहुतांश कार्यालयातील कर्मचारी स्वत:च कोणाला दुपारनंतर येऊ नका, असे सांगत असल्यानेही ना कर्मचारी ना कोणी नागरिक अशी स्थिती दिसून येत आहे.

Exit mobile version