गोरठण बुद्रुकमध्ये ग्रामपंचायतीच्या आदेशाला केराची टोपली
| वावोशी | प्रतिनिधी |
छत्तीशी विभागात सध्या गुरुचरण जागेतील बेकायदेशीर अतिक्रमणाचा विषय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता गोरठण बुद्रुक ग्रामपंचायतच्या आदेशांना देखील उघडपणे धाब्यावर बसवून गायरान जमिनीवर चाललेली बेकायदेशीर वाणिज्यिक अतिक्रमणे थांबण्याचे नाव घेत नाहीत! सरपंच अॅड. रमेश पाटील यांनी थेट आदेश देवूनही, ‘कायदा माझ्या मुठीत’ अशा थाटात काही व्यक्तींनी बांधकाम सुरूच ठेवले आहे. गावातील गोरगरीब व गुरंढोरांसाठी राखीव असलेली गायरान जमीन आता मुट्ठीभर लोकांच्या वसाहतीखाली जात आहे.
8 मे 2025 रोजी ग्रामस्थ संतोष अशोक साकोस्कर यांनी या अतिक्रमणाची तक्रार दिल्यानंतर, ग्रामपंचायतीने हरेश पाटील, निलेश पाटील आणि रंजीत पाटील या तीन अतिक्रमणकर्त्यांना नोटीस पाठवली. यामध्ये कोणतीही बांधकाम परवानगी नसल्याचे नमूद करून, तातडीने बांधकाम थांबवण्याचा इशारा दिला होता. पण या तिघांनी या नोटीसीला पण झुगारून बांधकाम अधिकच जोमात सुरू ठेवले आहे. या अवमानकारक कृत्यामुळे गावात चर्चा पेटली आहे. हे अतिक्रमणकर्ते नेमके कोणाच्या छत्रछायेखाली इतके बेधडक झालेत? प्रशासन गप्प का? लोकशाही संस्थांवरचा विश्वास डळमळू लागला आहे, ग्रामपंचायतीची पत धोक्यात आली आहे, आणि गायरान जमिनीचा वापर ‘श्रीमंतांच्या वाणिज्यिक सोयी’साठीच होतो की काय, अशी संतप्त भावना आता गावकर्यांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. जर ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार खालापूर यांच्याकडून आपल्याला न्याय मिळाला नाही, तर तक्रारदार संतोष साकोस्कर हे थेट जिल्हाधिकार्यांच्या दरबारात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे.
गोरठण बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत गुरुचरण जागेवर बेकायदेशीर वाणिज्य बांधकामांचा सपाटा लावला असून जणू बांधकामाची चढाओढ लागल्यासारखी येथील परिस्थिती असून ‘कायदा’ आता निव्वळ कागदावरच उरला आहे का? की पुन्हा एकदा ‘सिस्टम’ अतिक्रमणकर्त्यांच्या बाजूने झुकणार? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
संतोष साकोसकर यांचा तक्रारी अर्ज आम्हाला प्राप्त झाला असून त्यावर त्वरित कारवाई केली गेली आहे. संबंधित अतिक्रमण करणार्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यानंतर देखील जर बेकायदेशीर बांधकाम सुरू राहिले, तर ग्रामपंचायत कायद्याचा आधार घेत कठोर आणि सक्षम पावले उचलेल. गायरान जमिनीचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे, आणि ती आम्ही पूर्णपणे पार पाडणार आहोत.
– अॅड. रमेश पाटील, सरपंच
ही गायरान जमीन गावातील गोरगरिब आणि गुरंढोरांसाठी राखीव आहे. तिथे काही लोकांनी परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक बांधकाम सुरू केले आहे. ग्रामपंचायतीला सूचना दिल्यानंतरही योग्य ती कारवाई होत नसेल, तर आम्ही हे प्रकरण थेट जिल्हाधिकार्यांकडे नेणार आहोत.
– संतोष साकोसकर, ग्रामस्थ, वावोशी फाटा