। ठाणे । प्रतिनिधी ।
जनावरांना चारा घेण्यासाठी आलेल्या शेतकर्यावर अज्ञाताने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पश्चिमेकडील सापाड गावात राहणारे बारक्या मढवी जनावरांना चारा नेण्यासाठी गेले होते. याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लक्ष्मी मार्केट परिसरात अज्ञात इसमाने मढवी यांच्यावर कोयत्याने सहा ते सात वार केले. या हल्ल्यात मढवी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून महात्मा फुले पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.