फेरफार उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची फरफट

कर्जत तहसिलदारांचा अजब कारभार
उतारा मिळेपर्यंत कार्यालयातच ठिय्या

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे फेरफार उतारे तलाठी कार्यालयातून कर्जत तहसील कार्यालयात नेण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या उतारांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. तहसीलदारांच्या अजब कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून, सोमवारी (दि.14) रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत या विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवून ठेवले होते. त्यामुळे जोपर्यंत उतारे मिळाले नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मारला होता.

कर्जत तालुका हा बहुतांशी ग्रामीण आणि आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. येथील मुख्य व्यवसाय शेती असून, शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे फेरफार, सातबारा आणि इतर महत्त्वपूर्ण दस्तावेज आतापर्यंत गावातील जवळच्या तलाठी कार्यालयात सहज मिळत होते. मात्र, कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता थेट तालुक्याच्या गावाला चकरा माराव्या लागत आहेत. तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी अचानक मंडळ अधिकारी व तलाठी यांना तोंडी आदेश देऊन फेरफार दप्तर कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्याचे फर्मान सोडले. या आदेशानुसार सर्व फेरफार दप्तर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. या निर्णयामुळे नांदगाव, खांडस यांसारख्या दुर्गम आणि लांबच्या भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. गावात दोन मिनिटांत मिळणाऱ्या फेरफारसाठी आता शेतकऱ्यांना पूर्ण दिवस खर्च करावा लागत आहे. तसेच, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

अनेकदा सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत थांबूनही, “साहेबांची सही झाली नाही, उद्या या” असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. काही शेतकऱ्यांना गाव नमुना 14 चा उतारा मिळवण्यासाठी 10 ते 12 पेक्षा जास्त फेऱ्या माराव्या लागल्या आहेत, तर काहींचे अर्ज तब्बल 4 महिने उलटूनही प्रलंबित आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात आता स्वतः शेतकऱ्यांनीच आक्रमक भूमिका घेतली आहे. “जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देणारे उपक्रम शासनाकडून का राबवले जात आहेत? तलाठी कार्यालयातील जुने सातबारा व फेरफार तहसील कार्यालयात जमा करण्याचे लिखित आदेश आहेत का?” असे सवाल करत, तहसीलदारांनी हा जाचक आदेश ताबडतोब रद्द करावा आणि जमा केलेले दप्तर पुन्हा संबंधित तलाठी कार्यालयात पाठवावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने कर्जत तहसीलदारांना करण्यात आली आहे.

मी फेरफार मिळवण्यासाठी 7 तारखेला अर्ज केला होता, 13 तारीख उजाडली तरी फेऱ्याच मारत आहे. एखादा शेतकरी खांडसवरून 200 रूपये भाडे खर्च करून येतो, त्याचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया जात आहेत. तलाठ्यांकडे अधिकार असताना काम 2 दिवसांत व्हायचे, पण तहसीलदारांनी दप्तर येथे आणल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

– विनायक देशमुख, शेतकरी, गौरकामत

आमच्या शेतीचे फेरफार घेण्यासाठी आता तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने मोठी धावपळ होत आहे. तलाठी कार्यालयात हे काम जलद गतीने व्हायचे. आता एक फेरफार काढण्यासाठी पूर्ण दिवस वाया जातो, पैसा खर्च होतो आणि तरीही काम होईल याची शाश्वती नसते.

– काशिनाथ शिंदे, शेतकरी, हालिवली

Exit mobile version