तातडीने पंचनामे करण्याची बाबूराव बामणे यांची मागणी
| खांब-रोहा | वार्ताहर |
गेली पंधरा दिवस सातत्याने परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने तयार भातशेती पाण्यात गेल्याने शेतकरी वर्गाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. याबाबत शासनाने त्वरित दखल घेऊन तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी रोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाबूराव बामणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
पावसाळी भातशेती तयार होऊन भातशेती कापणी बांधणीच्या हंगामात परतीचा पाऊस गेली पंधरा दिवस मुसळधार स्वरूपात बरसल्याने शेतकरी वर्गाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. तर, ऐन दिवाळी हंगामाचे तोंडावर सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू असताना परतीच्या पावसाने सर्वच बाबतीत शेतकरी वर्गाचे फारच मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी वर्गावर दु:खाची कुर्हाडच कोसळली आहे. भाताची कापण्यालायक रोपच शिल्लक नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. आपल्या संपूर्ण वर्षभराची रोजीरोटी व आर्थिक बजेट शेतीवरच अवलंबून असल्याने शेतकर्यांच्या हाताशी काहीच शिल्लक नसल्याने त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासनाने त्वरित दखल घेऊन तातडीने पंचनामे करावेत.
तसेच लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करून शेतकरी वर्गाला दिलासा मिळवून द्यावा तसेच शासनाकडून मिळणारा बोनसही यावर्षी मिळाला नसल्याने तोही लवकरच मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी शेवटी त्यांनी केली आहे.