| पनवेल | प्रतिनिधी |
सध्या पनवेल तालुक्याचे तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे नोंदविले गेले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर उष्माघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळी आणि संध्याकाळी शेतातील कामे करण्याची गरज आहे. तसेच, पुरेसे पाणी पिणे आणि आहारात फळभाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे, असे आवाहन पनवेलचे अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
तालुक्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून, उष्माघात जीवावर बेतू शकतो. त्यामुळे शेतातील कामांच्या वेळा बदलण्याची गरज असून, 12 ते 4 मध्ये शक्यतो बाहेर जाणे टाळावे. सध्या शेतात फळभाज्या, भाजीपाला, फळबागा अशी पिके उभी आहेत. तसेच, अनेक भागातील शेतांच्या मशागती, खत घालणे, बांधबंदिस्ती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दुपारच्या वेळेत शेतात काम करू नये, असा सल्ला दिला आहे.
या समस्या उद्भवू शकतात
उष्माघात, उन्हाळी लागणे, चक्कर येणे, पोटदुखी, डोकेदुखी.
घ्यावयाची काळजी: सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत काम करा. रात्रीच्या गारव्यात साप बाहेर पडतात. त्यामुळे रात्री गमबूट वापरा. अंगावर सुती व सैल कपडे वापरा. डोक्याला फेटा, टोपी, स्कार्फ, पदर असे संरक्षण असावे. डोळ्याला गॉगल, चष्मा लावा. पाण्याची बाटली सोबत ठेवा. हलके व ताजे अन्न खा. टप्प्याटप्प्याने भरपूर पाणी प्या.
पनवेल तालुक्यात वाढलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. उष्माघातासारख्या गंभीर समस्यांपासून बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळेत शेतातील कामे टाळून सकाळी व संध्याकाळीच काम करावे. पुरेसे पाणी पिणे, हलका व ताजा आहार घेणे तसेच शरीराचे योग्य संरक्षण करणे गरजेचे आहे. कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. स्वतःची काळजी घेणे हीच खरी सुरक्षितता आहे.
जितेंद्र इंगळे,
अप्पर तहसीलदार, पनवेल
उन्हाळ्यात टप्प्याटप्प्याने भरपूर पाणी प्यावे. एकदम किंवा फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. उष्ण, तेलकट, मसालेदार जेवण टाळावे. याउलट पाणी धरून ठेवणाऱ्या फळभाज्यांचा आहार वाढवावा. मांसाहार मर्यादित करावा. खरबूज, कलिंगड, नारळ याचे सेवन करावे. चक्कर येणे, मळमळणे, जीभ किंवा त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.
डॉ. अपर्णा पवार,
तालुका आरोग्य अधिकारी.
