। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कडाव परिसरात काही फार्महाऊस मालकांनी शेतकर्यांच्या शेतातील पाण्याच्या नैसर्गिक मार्गावर अडथळा निर्माण केला आहे. पावसाचे पाणी शेतकर्यांच्या शेतात साचल्याने शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकर्यांनी तहसील कार्यालयात तक्रार केली होती. त्याची दखल घेत तहसिलदार विक्रम देशमुख यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच येथील शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतात पाणी साचत असल्यामुळे परिसरातील अनेकांनी भातशेती ओसाड टाकली आहे. ही बाब तहसिलदारांना अर्ज करुन व प्रत्यक्ष भेट घेऊन निदर्शनास आणुन दिली. त्यांनी तातडीने दखल घेऊन तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यास सांगितले. पंचनामा सादर केल्यानंतर प्रत्यक्ष तहसिलदारांनी शेतातून वाहणार्या नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गाची पाहणी केली. त्यांनी लवकरच पाण्याचा नैसर्गिक मार्ग पुर्ववत करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी आशिष राऊत, मधुकर गंगावणे, अजय गंगावणे, जगन्नाथ शिंदे, उषा गंगावणे, रेखा गंगावणे, वैशाली गंगावणे, पिंकी गंगावणे, प्रभाकर गंगावणे उपस्थित होते.







