मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

| मुंबई | प्रतिनिधी |

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिलजवळ कंटेनर कारवर पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

लोणावळ्याकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एम.एच.14 एफ.टी. 1445) हा समोरून येणाऱ्या कारवर (एम.एच.14 बी.एक्स.1605) पलटला. प्राथमिक माहितीनुसार कार ही अलिबाग वरून तळेगाव, मावळ या दिशेने निघाली होती. या कारमधून तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करत होते. अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर योगेश चौधरी, जान्हवी योगेश चौधरी, दिपांशा योगेश चौधरी, जिगिशा योगेश चौधरी, मितांश दत्तात्रय चौधरी आणि भूमिका दत्तात्रय चौधरी हे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची बातमी मिळताच महामार्ग पोलीस तसेच, ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या बचाव पथकाचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करून सर्वप्रथम कारमध्ये अडकलेले सर्व जखमी तसेच दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

Exit mobile version