आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावले
| चिरनेर | प्रतिनिधी |
येथील करंजा मच्छिमार बंदरातील मच्छिमारांची कोट्यवधींची मासळी खरेदी करून पैसे न देता फसवणूक करणाऱ्या दलाल, व्यापारी, निर्यातदारांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला आहे. यामुळे फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईतील ससून डॉक बंदरातील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे सुमारे 250 कोटी रुपये खर्चून मच्छिमारांसाठी अद्ययावत बंदर उभारण्यात आले आहे. नव्याने उभारण्यात आलेले बंदर मासळी निर्यातीसाठी रायगड जिल्ह्यासह स्थानिक हजारो मच्छिमारांना करंजा मच्छिमार बंदर सोयीचे आणि फायदेशीर ठरले आहे. त्यामुळे या करंजा मच्छिमार बंदरातून काही महिन्यांतच सुमारे 600 कोटींहून अधिक रुपयांच्या मासळी निर्यात करण्यात आली आहे.
नव्याने उभारण्यात आलेल्या या करंजा बंदरात मुंबईतील अनेक जुन्या परिचित मासळी व्यापारी, निर्यातदारांनी शिरकाव केला आहे. स्थानिक मच्छिमार व्यापारी, दलालांना हाताशी धरून काही नव्या निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी बंदरातून मासळी खरेदी करण्यास सुरुवात केली होती. बंदरातील शेकडो स्थानिक मच्छिमारांनीही परिचित स्थानिक दलालांवर विश्वास ठेवून कोट्यवधी रुपयांचे मासळी विक्रीचे व्यवहार केले होते. सुरुवातीला निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी स्थानिक मच्छिमारांना मालाचे पैसे देऊन मच्छिमारांचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यानंतर खरेदी केलेल्या मासळीचे पैसे देण्यात दलाल, व्यापारी टाळाटाळ करु लागले. यावर कहर की काय, मच्छिमारांचे कोट्यवधींची थकीत रक्कम अदा न करताच निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी पळ काढला होता. स्थानिक मच्छिमारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, रमेश नाखवा, विघ्नेश कोळी आदी अनेक स्थानिक मच्छिमारांनी फसवणूक करणाऱ्या दलाल, व्यापारी, निर्यातदारांविरोधात उरण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीनंतर राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनीही मच्छिमारांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासूनच शोएब फारुख शेख, प्रशांत शेवाळे, दिनकर भेदाते, अनंत पाटील, विक्रम भेदाते, शहजाद अंसारी फरार झाले आहेत. आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज शनिवारी (दि. 4) फेटाळून लावला आहे. दरम्यान, मच्छिमारांनी एकजूट होऊन यापुढे तस्कर टोळ्याकडून फसवणूक होणार नाही यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केले आहे.