| खेड | प्रतिनीधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन सुमारे 100 फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असताना आज सोमवार (दि. 19) पहाटे हा अपघात झाला. या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला आहे. मेधा पराडकर, सौरभ पराडकर (22), मिताली मोरे (45) , निहार मोरे (19), श्रेयस सावंत (23) या पाच जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून, यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे. दोन्ही कुटुंबे मुंबई मिरा रोड भाईंदर येथून रात्री साडेअकराच्या सुमारास देवरूख येथे जात होते.
मिळालेल्या माहीतीनुसार, भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली. ही भीषण दुर्दैवी घटना पहाटे पाच ते साडेपाच सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात आणले. मात्र या अपघातातील पाच जणांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हालवण्यात आले आहे तर विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवण्यात आले आहे. पराडकर कुटुंबीय नालासोपारा परिसरात राहणारे आहेत तर मोरे मीरा-भाईंदर येथील आहेत. घटनास्थळी मदतीकरता पोलिसांनी व महामार्ग पोलिसांनी धाव घेतली होती तातडीने कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आले.
कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.