गणपती विसर्जनादरम्यान पाच जण बुडाले; दोघांना वाचवण्यात यश

। मुंबई । प्रतिनिधी ।
कोरोनामुळे गेले दोन वर्ष गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रशासनाच्या माध्यमातून विविध नियामावलीही जाहिर करण्यात आली होती. विसर्जन घाट तयार करण्यात आले होते. मात्र विसर्जनासाठी जागा ठरवून दिलेली असतानाही अनेकजण उत्साहाच्याभरात भलत्याच ठिकाणी जाऊन पाण्यासोबत खेळ करतात आणि जीव गमावतात. असाच एक प्रकार वर्सोवा जेट्टी येथे काल घडला.

मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान पाच मुलं समुद्रात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. वर्सोवा जेट्टी येथे रविवारी (19 सप्टेंबर) गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात उतरलेले पाच जण समुद्रात बुडाले आहेत. त्यापैकी, दोन मुलं बचावली आहेत तर, तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) रविवारी याबाबतची माहिती दिली आहे.

समुद्रात बुडालेल्या पाच जणांपैकी दोघांना स्थानिकांनी वाचवलं आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर उर्वरित तिघांचा मुंबई अग्निशमन दल शोध घेत आहे. बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. बीएमसीने रविवारी याबाबतचं ट्विट केलं आहे. या घटनेनंतर, मुंबईतील गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याचं म्हटलं जात आहे.

ही विसर्जनासाठी ठरवून दिलेली जागा नव्हती. आम्ही लोकांना इथे गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यावर बंदी घातली होती. मात्र, तरीही अनेक जण इथे दाखल झाले, असं वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज वामन पोहाणेकर यांनी सांगितलं आहे. या शोध मोहिमेसाठी नौदलाचे डायव्हर्स आणि पोलिसांच्या बोटीची मदत घेण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन विभागाच्या मुख्य अग्निशमन अधिकार्‍याने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे.

Exit mobile version