| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईमध्ये पाण्याच्या टाकीची सफाई करताना 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतल्या नागपाडा परिसरात आज रविवार (दि.09) सकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका इमारतीची पाण्याची टाकी साफ करत असताना पाच कामगार बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून या पाचही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. ही बिल्डिंग दिमटिमकर रोडवरील गुड लक मोटर ट्रेनिंग स्कूलजवळ आहे. या बिल्डिंगमधील पाण्याची टाकीच्या सफाईचे काम सुरू होते. पाण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी 5 सफाई कामगार आतमध्ये उतरले होते. पण गुदमरल्यामुळे ते आतमध्येच बेशुद्ध पडले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना आज सकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून तात्काळ नजीकच्या जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून गुदमरून या पाचही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.