तालुक्यातील उखळ आदिवासीवाडी झाली प्रकाशमान
रेवदंडा | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील फणसापूर येथील अतिदुर्गम अशा उखळ आदिवासी वाडीवर स्वातंत्र्यानंतर रविवारी प्रथमच वीज पोहोचली आणि सर्व आदिवासी बांधवांच्या चेहर्यावर समाधान झळकले. महातिवरणच्या फणसापूर शाखेंतर्गत या वाडीचे विद्युतीकरण करण्यात आले आहे.
महावितरण अलिबाग विभागातील फणसापूर शाखे अंतर्गत येणारी उखळ आदिवासीवाडी ही 10 ते 15 कुटुंबाची वस्ती असलेली वाडी. गेल्या 50 वर्षांपासून येथील आदिवासी बांध विजेपासून वंचित होते. ही बाब फणसापूर शाखेचे कनिष्ठ अभियंता निखलेश शेंडे व संबंधित शाखेचे कर्मचारी यांच्या कल्पकतेतून आदिवासीवाडी प्रकाशमान करण्यात आली आहे.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सदर उखळ आदिवासी वाडी येथे सर्व्हिस वायर व वीज मीटर तत्परतेने लावून सोबत एलईडी बल्ब व मेन स्वीच या गोष्टी भेट देऊन आदिवासी वाडीतील घरे प्रकाशमान करण्यात आली. याप्रसंगी स्वतः निखलेश शेंडे, कनिष्ठ अभियंता, फणसापूर शाखा, जयेंद्र सपकाळे, कनिष्ठ अभियंता, रेवदंडा शाखा 1 व कर्मचारी आत्माराम नांदगावकर, प्रधान तंत्रज्ञ, सिद्धेश्वर पवार, तंत्रज्ञ, आमिर शिगवण, वरिष्ठ तंत्रज्ञ, रुपेश ठाकूर, वरिष्ठ तंत्रज्ञ, दिलीप मांडे, तसेच बाह्य कर्मचारी सूरज शेळके, मोहन पाटील, अनिल पाटील, निखिल अवधुकर, तंत्रज्ञ, रामराज शाखा यांचे सहकार्य लाभले.