। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरूड तालुका हा निसर्गाने नटलेला आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणावर वनक्षेत्र असून यात अनमोल अशा औषधी वनस्पती आहेत. परंतु, दैनंदिन लागत असलेल्या आगीत या नष्ट होताना दिसत आहेत. मुरुड तालुक्यातील एकदरा येथील गायमुख डोंगरावर रात्रीच्या वेळी वनवा लागून मोठ्या प्रमाणावर आग पसरली होती. या वणव्यामुळे लाख मोलाची वृक्षसंपत्ती आणि तृणभक्षी वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील संतुलन बिघडण्यासाठी हे वणवे कारणीभूत ठरत आहेत. या तालुक्याला निसर्गाने अनमोल संपत्तीच्या रुपात पर्वत, नद्या, जंगले, वन्यपशू, पक्षी, तलाव, झरे, दर्या इत्यादी वरदान स्वरुपात दिले आहे. परंतु ही संपत्ती योग्यप्रकारे संरक्षण केली जात नाही. डोंगराच्या जमिनीवर पडलेला पाळापाचोळा वाळतो. कापलेले किंवा उखडून पडलेले अनेक वृक्ष आणि फांद्या सुकलेल्या वाळलेल्या स्थितीत पडून असतात. त्या भागात जर वणवा किंवा आग लागली संपूर्ण परिसरात वणवा भयावह रुप धारण करतो. एकदा वणवा लागला की, संपूर्ण डोंगर परिसर व उंच पहाडापर्यंत वणवा भयावह रुप घेतो. त्यामुळे प्राणी-पक्ष्यांच्या कोवळ्या जीवांचा बळी जातो.