महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
| पनवेल | प्रतिनिधी |
खांदा वसाहत सेक्टर-8 परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास भूमिगत वीज केबलमधून अचानक धूर येऊ लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वीज प्रवाह तातडीने बंद करण्यात आला. मात्र त्यानंतर अनेक तास वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्यात रात्र जागून काढावी लागली.
घटना घडल्यानंतर नागरिकांनी तातडीने वीज वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक फोन सतत एन्गेज लागत होते, तर काही अधिकाऱ्यांकडून ‘मेसेज करा’ अशी उत्तरे मिळत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. ‘वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी नेमके कोणाशी संपर्क साधायचा?’ असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, वीज वितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करत दुसऱ्या केबलवरून वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळ वीज सुरूही झाली, मात्र अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा दुसऱ्या केबलमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण परिसर पुन्हा अंधारात गेला. वाढत्या उष्म्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे मोठे हाल झाले. अनेक नागरिक घराबाहेर रस्त्यावर येऊन बसल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले.
नागरिकांनी पनवेल, भिंगारी तसेच भांडुप येथील वीज वितरण कार्यालयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही अधिकाऱ्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आम्ही नियमित वीज बिल भरतो, मग चोवीस तास अखंड वीजपुरवठा देणे ही महावितरणची जबाबदारी नाही का? असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सध्या उकाड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून खांदा वसाहतीतील नागरिकांना अखंड वीजपुरवठा द्यावा, अशी जोरदार मागणी आता स्थानिकांकडून होत आहे.
आपत्कालीन सेवेसाठी केवळ दोन कर्मचारी
सध्या खांदा वसाहत परिसरात मोठ्या प्रमाणावर रीडेव्हलपमेंटची कामे सुरू असून नव्या इमारतींना वीजपुरवठा देण्यासाठी भूमिगत केबलचे काम सुरू आहे. या कामांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या वीजपुरवठ्यावर होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण खांदा वसाहतीतील रात्रीच्या आपत्कालीन सेवेसाठी केवळ दोन कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.
