गारमाळ धनगरवाडा ग्रामस्थांचे उपोषण मागे

| खोपोली | प्रतिनिधी |

चावणी ग्रामपंचायत हद्दीतील गारमाळ धनगरवाडा येथील ग्रामस्थांचे रस्त्यासाठी चावणी ग्रामपंचायत आणि हिरानंदानी कंपनी विरोधात उपोषणकर्ते मारुती शेडगे आणि ग्रामस्थांनी आजपासून आमरण उपोषण चालू केले होते.

गेल्या अनेक वर्षापासून या वाड्याकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे चावणी ग्रामपंचायत आणि हिरानंदानी कंपनी विरोधात आमरण उपोषण चालू केले होते याची गंभीर दखल चावणी ग्रामपंचायतने घेतली असून चावणी ग्रामपंचायतने लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिल्याने त्यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे.

गारमाळ धनगरवाडा येथे धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षांपासून वस्ती आहे. मात्र, या गावाकडे जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नाही तर पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना पायपीट करत शाळेतील लहान मुले, गरोदर महिला यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस होणाऱ्या नाहक त्रासाला कंटाळून येथील ग्रामस्थ मारुती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थ आणि महिला येथील रस्त्यावर आमरण उपोषणाला बसले होते.

Exit mobile version