| गुहागर । वृत्तसंस्था ।
शहरातील समुद्रकिनार्यावरुन ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 35 पिल्लांना तिन दिवसांत समुद्रात सोडण्यात आले. यावर्षीच्या हंगामातील ही पहिलीच वेळ आहे. तालुक्यातील गुहागरसह तवसाळ या दोन गावात वन विभागाने 27 घरट्यातील 3 हजार 98 अंडी संरक्षित केली आहेत. यावर्षी कासव महोत्सवाचे आयोजन करण्याचा विचार वन विभाग करत आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक पिल्ले समुद्रात झेपावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षात कासव संवर्धन करणारे शहर अशी गुहागरची ओळख बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास (ता. मंडणगड) पाठोपाठ गुहागर शहरातील समुद्रकिनार्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीची सर्वाधिक घरटी संरक्षित केली जातात. यावर्षी गुहागरमध्ये 23 नोव्हेंबरला पहिले घरटे मिळाले. आजपर्यंत गुहागरच्या समुद्रकिनार्यावर 25 घरट्यांमधून 2 हजार 858 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. तवसाळ येथेही वन विभागातर्फे ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहिम राबवली जाते. तेथे 2 घरट्यातून 240 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. 23 नोव्हेंबरला मिळालेल्या घरट्यात 123 अंडी होती. या घरट्यातून गेले दोन दिवस कासवाची पिल्ले बाहेर पडत आहेत. 12 ते 14 जानेवारी या तीन दिवसात सकाळी आणि संध्याकाळी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.