केमिकलयुक्त पाणी सोडल्याने बाळगंगा प्रदूषित
प्रदूषण मंडळाकडून कंपनीला बंदची नोटीस
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील खोपोली-पेण मार्गावर असणार्या तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतील पोलाद उत्पादन करणार्या उत्तम स्टील कारखान्यातून केमिकलयुक्त पाणी बाळगंगा नदीत सोडून नदीचे पाणी प्रदूषित करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रदूषण मंडळाने कंपनीला बंदची नोटीस बजावली आहे.
बाळगंगा नदीच्या पाण्यावर 15 हून अधिक ग्रामपंचयतींच्या पाणी योजना असल्याने या दूषित पाण्यामुळे 50 गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाल्याने याठिकाणी प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत प्रदूषण मंडळ, कोकण भवन येथील अधिकारी वर्गाला पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार सदरचा प्रकार हा पर्यवरणाला बाधा आणणार असून, नागरिकांच्या जीवाशी खेळणारा आहे. याची गंभीरता लक्षात घेत रायगड जिल्हा प्रदूषण मंडळाच्या कार्यलयाकडून उत्तम स्टील कंपनीला कारखाना बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
तांबाटीचे सरपंच अनिल जाधव, जाभिवलीचे सरपंच दिनेश घाडगे, नितीन कदम, राकेश लाड, मनसे कार्यकर्ते महेश सोगे, आशिष कोंडे, अविनाश कदम, मोहन घाडगे, सुधीर दळवी, संतोष पाटील यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक झाल्याने तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशाने वावोशीचे मंडळ अधिकारी तुषार कामत यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सजा नारंगी माधव कावरखे व कर्मचारी वर्गाने घटनास्थळी पाहणी करून पंचनाम करून तीन ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन प्रदूषण मंडळाचे अधिकारी व्ही.व्ही. किल्लेदार यांना कळविले. त्यानंतर फिल्ड ऑफिसर अरविंद धपाटे यांनी घटनास्थळी भेट दिली व सदरचा प्रकार पाहता त्यांना ही लालसर पाणी मोठ्या प्रमाणात सोडलेले निदर्शनास आले. त्यामुळे तात्काळ पंचनामा करून जाबजबाब तयार करून त्यांनी ही प्रत्येक ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन प्रादेशिक प्रदूषण मंडळ रायगड अधिकारी व्ही व्ही किल्लेदार यांना सादर करून सदरचा प्रकार लेखी व तोंडी स्वरूपात सांगितल्याने वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अधिकार वापरीत उत्तम स्टील कारखान्याला कारखाना बंद करण्याचे आदेश लेखी पत्राव्दारे पाठविण्यात आले आहे, त्यामुळे या कारखान्यात काम करणार्या कामकागारांच्या नोकरीवर येथील व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे गदा आली आहे, त्यामुळे येथील व्यवस्थापनाच्या विरोधात कामगार वर्गातून ही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
18 ऑगस्टला नाल्यावाटे प्रदूषित पाणी सोडल्याचे निदर्शनास आले आहे. याआधीही अनेक वेळा त्यांना याच संदर्भात नोटीसीही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाशी ही कंपनी खेळत असल्याचे दिसून आल्याने बंदची नोटीस बजावण्यात आली आहे.
व्ही.व्ही. किल्लेदार, प्रदूषण मंडळ प्रादेशिक अधिकारी, रायगड