पंडित पाटील यांचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अलिबाग शहराला पाण्यासाठी निधी मिळावा यासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु, पाण्यासाठी निधी दिला जात नाही. पाण्याच्या योजनेत सरकार राजकारण करत आहे, असा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे. सरकारने श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, मुरुड, तळा, कर्जत या ठिकाणी पाण्याची योजना राबविल्या आहेत. म्हसळ्यामध्ये जिल्हा परिषदेकडून पाण्याची योजना राबवूनदेखील पुन्हा 43 कोटी रुपयांचा निधी पाणी योजनेसाठी मंजूर केला आहे. परंतु, अलिबाग शहराला पाण्याची योजना देण्यात सरकार दुजाभाव करीत आहे. अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, एक ऐतिहासिक भूमी म्हणून अलिबागची ओळख आहे. वेगवेगळी सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज असून, या ठिकाणी नागरिकांची वर्दळही प्रचंड वाढली आहे. शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने पाण्याची गरज ही महत्त्वाची ठरत आहे. पाण्याअभावी शहरातील काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ नगर परिषदेवर येत आहे.
शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी अनेक वेळा सरकारकडे केली आहे. परंतु, सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पंडित पाटील यांनी केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या शहराच्या विकासासाठी निधी देण्यास का टाळाटाळ होत आहे, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
या शहरात जिल्हाधिकाऱ्यांपासून जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य खात्यातील अधिकारी राहतात. पण, शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यास का दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मागील सात ते आठ वर्षात श्रीवर्धन व अन्य शहरांसाठी अनेक योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अलिबाग शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केला जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे.
जिल्ह्यात अनेक शहरांमध्ये कमान आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा इतिहास आजच्या तरुण पिढीला राहावा यासाठी त्यांच्या नावाची कमान व्हावी, अशी मागणी अनेक वेळा सरकारकडे केली आहे. परंतु, त्याकडेही सरकारने दुर्लक्ष केले, असा आरोप पंडित पाटील यांनी केला आहे.