आठ आमदारांसह खा. बारणे यांची बैठक रद्द करण्याची मागणी
| अलिबाग | भारत रांजणकर |
रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार दिनांक २७ जुन रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही बैठक पुढे ढकलण्याची मागणी शेकाप आमदार जयंत पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आणि सेनेच्या सहा आमदारांनी केली आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत ही बैठक होण्यासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे कमालीच्या आग्रही आहेत. त्यासाठी त्या जिल्हा प्रशासनावर दबाव आणत असल्याचे वृत्त आहे.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद, यांची मुदत संपलेली असल्याने जिल्हा नियोजन समिती सदस्यत्व आपोआप रद्द ठरले आहे. त्यामुळे आता या समितीत पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आमदार जयंत पाटील, आमदार निरंजन, डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे हे विधान परिषदेचे सदस्य तसेच आमदार भरत गोगावले, आ महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, आ. प्रशांत ठाकूर, आ. रवींद्र पाटील, आ. महेश बालदी हे तसेच निमंत्रित सदस्य या सभेला उपस्थितीत राहू शकणार आहेत. शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या कारवायांमुळे सध्या राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. सरकारचेच भवितव्य अधांतरी आहे. या पार्श्वभूमीवर सध्यातरी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करणे योग्य होणार नाही. अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आमदार जयंत पाटील, आमदार निरंजन, डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार भरत गोगावले, आ महेंद्र थोरवे, आ महेंद्र दळवी, आ प्रशांत ठाकूर, आ, रवींद्र पाटील, आ महेश बालदी यांची आहे. त्याबाबतचे पत्र देखील या आमदारांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र पालकमंत्री अदिती तटकरे मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही बैठक होण्यासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे कमालीच्या आग्रही आहेत. त्यासाठी त्या जिल्हा प्रशासनावर दबाव आणत असल्याचे वृत्त आहे. गणसंख्या पूर्तीअभावी ही बैठक रद्द होवू शकते. दरम्यान जिल्हा नियोजन अधिकारी जे डी मेहेत्रे यांच्या शी संपर्क साधला असता सदर नियोजन समितीची बैठक ही पूर्व नियोजित असून राज्य सरकारकडून पार पाडण्याच्या सूचना असल्याने आयोजित करण्यात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.