…. बाहेर पडायचं नाही, पण घरात राहूनही जीव गेलाच ना!

मुबंई । वृत्तसंस्था।

मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून आलं. मात्र, चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. पावसाच्या परिणामामुळे दरड भिंतीवर कोसळल्यामुळे ही भिंतच कडेच्या घरांवर कोसळली. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही एनडीआरएफचं पथक घटनास्थळी हजर आहे. आत्तापर्यंत ६ जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून अजून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसऱ्या घटनेमध्ये एक दुमजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

एनडीआरएफनं दिलेल्या माहितीनुसार, या भागामध्ये ५० मीटरच्या अंतरावर दोन घटना घडल्या आहेत. यामध्ये एका घटनेत दरड कोसळली असून दुसरीकडे बीएआरसीची भिंत कोसळली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मिळून आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांचा वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. एकीकडे चेंबूरमध्ये १७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबईच्या विक्रोळी परिसरातून अशीच एक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरामध्ये एक दुमजली इमारत कोसळल्यामुळे ६ जणांचा मृत्यू गेल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी बचावपथकं दाखल झाली असून अजूनही कुणी मलब्याखाली दबलं आहे का? याचा शोध बचाव पथकाच्या माध्यमातून घेतला जात आहे.

चेंबूर आणि विक्रोळीप्रमाणेच भांडुपमध्ये देखील अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली आहे. भांडुपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून सोहम थोरात असं या मुलाचं नाव आहे. भांडुपच्या अमरकोट भागामध्ये वनविभागाची भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. हा मुलगा घरात आलेलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी डोंगरावरचे दगड आणि माती खाली आली. 

Exit mobile version