जिल्ह्यात जड-अवजड वाहनांना बंदी

कोंडीबरोबरच अपघात रोखण्यासाठी अधिसूचना जारी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात लाखोच्या संख्येने पर्यटक येणार आहेत. पर्यटकांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन दिवस अवजड वाहनांना बंदी घातली आहे. बुधवार दि.31 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते गुरुवार दि.1 जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ही बंदी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहे. 2025 या वर्षाला निरोप व 2026 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड या पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात येणार आहेत. काही पर्यटक निघाले असून काही पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून या महामार्गांवरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यात वडखळ-अलिबाग हा एकेरी रस्ता आहे. तसेच, अलिबाग-रेवस व अलिबाग-रेवदंडा-मुरूड हे रस्ते अरूंद आहेत. या मार्गावरून पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व जाणारी वाहने व त्याच वेळी होणारी डंपर, ट्रक व इतर जड-अवजड वाहनांची वाहतूक यामुळे कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने थर्टी फर्स्ट निमित्त उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यावेळी मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 येथील खारपाडा ते कशेडी, राष्ट्रीय मार्ग क्र. 753-एफ येथील माणगांव-ताम्हणी घाट मार्गे दिघी, राष्ट्रीय मार्ग क्र. 584-अ येथील कर्जत-पळसदरी-खोपोली-पालीफाटा-वाकण, राष्ट्रीय मार्ग क्र. 166 येथील वडखळ-अलिबाग, राज्य मार्ग येथील चौकफाटा-कर्जत, अलिबाग-मूरूड व अलिबाग-मांडवा या मार्गावरूनबुधवारी (दि.31) सकाळी आठ ते 1 जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे. या कालावधीत वाहन चालकांनी पर्यायी नियोजन व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जीवनाश्यक वस्तू नेणारी वाहने सुरू
मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड, कर्जत, माथेरान, खालापूर, इमॅजिका, पाली, महड, रायगड किल्ला अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात पर्यटक त्यांची वाहने घेऊन रायगडमध्ये येण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यांना भेटी देणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जीवनाश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिकांना लागू राहणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Exit mobile version