पावसाळ्यातही क्रिकेटचा उत्साह कायम

माणगावात क्रिकेट स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद

| माणगाव | सलीम शेख |

पावसाळा म्हटलं की शेतीची कामे, हिरवागार निसर्ग आणि धबधब्यांची भटकंती अशीच सर्वसाधारण कल्पना केली जाते. मात्र, माणगाव तालुक्यात या दिवसांत एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस, चिखलाने भरलेली मैदाने आणि अंगावर कोसळणाऱ्या सरी यांची पर्वा न करता तालुक्यातील विविध गावांमध्ये माणगाव क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रबरी बॉल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांना खेळाडूंसह ग्रामस्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अनेक जण पावसाळ्यात पर्यटनासाठी किंवा घरात वेळ घालविणे पसंत करतात. मात्र, माणगाव तालुक्यातील युवकांनी क्रिकेटलाच आपला आनंदाचा उत्सव बनवला आहे. संपूर्ण शरीर चिंब भिजलेले, कपडे चिखलाने माखलेले, हात-पाय थकलेले असले तरी खेळाविषयीची त्यांची निष्ठा आणि जिद्द कमी होत नाही. उलट प्रत्येक षटकागणिक मैदानावरील उत्साह आणखी वाढताना दिसतो. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा साधारणपणे उन्हाळा किंवा हिवाळ्यात आयोजित केल्या जातात. मात्र, माणगाव तालुक्यातील क्रिकेटप्रेमींनी ही परंपरा मोडीत काढत पावसाळ्यातही क्रिकेटचा उत्सव सुरू ठेवला आहे. प्रत्येक गावात संघांची चुरशीची लढत रंगत असून, मैदानावर खेळाडूंच्या उत्साहाला पावसाचाही अडथळा ठरत नाही. पावसाळ्यात क्रिकेट खेळणे हे सोपे काम नाही. मैदानावर चिखल व पाणी साचलेले असते. धावताना घसरण्याचा तसेच दुखापत होण्याचा धोका असतो. तरीही हे सर्व आव्हान स्वीकारत युवक जोमाने मैदानात उतरतात. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना अंगावर सतत कोसळणारा पाऊस, चिखलात पडून पुन्हा उभे राहण्याची जिद्द आणि विजयासाठीचा संघर्ष हे दृश्य उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करणारे ठरत आहे.

या स्पर्धा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसून, ग्रामीण भागातील तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना, नेतृत्वगुण, शिस्त आणि क्रीडासंस्कृती रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही करत आहेत. गावागावातील क्रिकेटप्रेमी, माजी खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकही मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याने स्पर्धांना जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खेळाडूंच्या मते, पावसात क्रिकेट खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चिखलात झेल घेणे, घसरत धावा वाचवणे, भिजत-भिजत चौकार-षटकारांची आतषबाजी करणे आणि प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटणे हा अनुभव इतर कोणत्याही मोसमात मिळत नाही. याच कठीण परिस्थितीत खेळल्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताकद वाढते, आत्मविश्वास बळकट होतो आणि मोठ्या स्पर्धांसाठी आवश्यक असलेली जिद्द विकसित होते, असे खेळाडू आवर्जून सांगतात.

माणगाव तालुक्यातील अनेक युवा क्रिकेटपटूंनी याच ग्रामीण स्पर्धांमधून आपली कारकीर्द घडवत जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे अशा स्पर्धा ग्रामीण भागातील लपलेल्या गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत असून, भविष्यातील क्रिकेटपटू घडविण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे क्रीडाप्रेमींनी नमूद केले. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत माणगावच्या मैदानांवर उमटणारा जल्लोष, खेळाडूंचा अविरत संघर्ष आणि क्रिकेटप्रेमाची ही अनोखी परंपरा आज तालुक्याच्या क्रीडासंस्कृतीची नवी ओळख बनली आहे. पावसालाही न जुमानता क्रिकेटचा उत्सव साजरा करणाऱ्या या खेळाडूंची जिद्द आणि क्रीडाप्रेम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Exit mobile version