सांगा, मुलांनी खेळायचे कुठे?
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील मैदानात वेगवेगळे उपक्रम राबविण्याबरोबरच खेळण्याचा आनंद विद्यार्थी मनमुरादपणे लुटतात. लंगडी, खो-खो, कबड्डीसारखे खेळ या मैदानात खेळले जातात. परंतु, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जिल्ह्यातील शाळांची मैदाने आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. शाळेच्या आवारात नवनवीन इमारती बांधण्याच्या नादात शाळेचे मैदान गायब होऊ लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 शाळा मैदानाविनाच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात 15 तालुक्यांध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारित दोन हजार 566 शाळा आहेत. अनेक शाळा भौतिक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. अनेक शाळांना संरक्षण भिंत नाही. मैदाने नसल्याने विद्यार्थ्यांची खेळण्यासाठी कुचंबणा होत आहे. शाळेत खेळासाठी मैदाने नसणे, ही बाब गंभीर आहे. खेळातील नैपुण्य दाखविण्यासाठी खेळाडूंना वाव मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमधून नाराजीचा सूर येत आहे. पूर्वी शाळेची बैठ्या चाळीतील कौलारू इमारत असत. त्या ठिकाणी दोनच खोल्या असायच्या. विद्यार्थ्यांची संख्यादेखील प्रचंड होती. बैठ्या चाळीतील शाळेचा परिसर मोकळा असायचा. मैदानातील कोपरा फुलझाडांनी बहरलेला असायचा. त्यामुळे मधल्या सुट्टीत शाळेतील मैदानात कबड्डी व इतर खेळ खेळण्याचा आनंद प्रत्येक विद्यार्थी लुटत असत. शाळेतील विद्यार्थिनी लंगडी, पकडापकडीसारखे खेळ खेळत होते. त्यामुळे अभ्यासाबरोबरच मैदानी खेळावरही भर दिला जायचा. बैठ्या चाळीतील इमारतीच्या जागी आता स्लॅबच्या दुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. विद्यार्थी व कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. अद्ययावत अशी इमारत बांधण्यात आली. त्यामध्ये आधुनिक पद्धतीने डिजिटल स्वरुपाचे शिक्षण देण्यावर भर देण्यात आला. हा शासनाचा उपक्रम कौतुकास्पद असला, तरी जिल्हा परिषद शाळांच्या नव्या इमारती उभारत असताना बाजूच्या मैदानाची जागा कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
15 तालुक्यांपैकी 13 तालुक्यांतील 300 शाळांमध्ये मैदान नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शिक्षण विभागाकडून याकडे लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे खेळ भरविले जात आहेत. दोन हजार 566 शाळांपैकी 300 शाळा मैदानाविनाच आहेत. शाळांसमोर मैदान नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. मैदानाअभावी विद्यार्थ्यांना शाळेत खेळ खेळण्यास अडचणी निर्माण होत आहे.
मैदान नसलेल्या शाळांवर दृष्टीक्षेप
तालुका | शाळांची संख्या | |
कर्जत | 32 | |
माणगाव | 34 | |
पनवेल | 55 | |
पोलादपूर | 45 | |
रोहा | 35 | |
महाड | 20 | |
म्हसळा | 18 | |
अलिबाग | 15 | |
खालापूर | 09 | |
श्रीवर्धन | 09 | |
मुरूड | 08 | |
सुधागड | 03 | |
उरण | 02 | |
पेण | 01 | |
एकूण | 300 |
शिक्षण विभाग सुस्त
शिक्षण विभागाने मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. तीनशेहून अधिक शाळांना क्रीडांगणे नसताना, याचे गांभीर्य संबंधित विभागाला नसावे, याबाबत शिक्षण तज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त आहे. मुलांच्या बाबतीत शिक्षण विभाग इतका सुस्त कसा काय राहू शकतो, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मुलांसाठी मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी ज्या शाळांमध्ये क्रीडांगणे नाहीत, अशा शाळांना पर्यायी व्यवस्था शिक्षण विभागाने करुन देणे गरजेचे आहे. बौद्धिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणेदेखील महत्त्वाचे आहे. यासाठी मैदानांची आवश्यकता आहे.
अशोक जोशी,
पालक, पनवेल