भाजप वरिष्ठांच्या आमदारांना सूचना
| मुंबई | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीत महायुतीने ‘मिशन 45 प्लस’ अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे. त्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते कामाला लागले असून राज्यस्तरीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही टार्गेट देण्यात आली आहेत. ज्यांना आमदारकीचं तिकिट हवं असेल, त्यांनी लोकसभेला आपल्या विधानसभा मतदारसंघातून मोठी लीड देणं बंधनकारक आहे, असं भाजपच्या पहिल्या फळ्यातील नेत्यांनी सांगितल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा आमदार आणि इच्छुक उमेदवारांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा आमदारकीचं स्वप्न पाहायचं असेल, तर आतापासूनच जोमाने कामाला सुरुवात करावी लागेल. विधानसभेची उमेदवारी हवी असेल, त्यांनी लोकसभेला आपल्या विधानसभा क्षेत्रातून संबंधित उमेदवाराला मोठं मताधिक्य देणं बंधनकारक आहे.
भाजप नेत्यांनी विधानसभा आमदारांना टार्गेट दिलं आहे. त्यानुसार प्रत्येकाचं रिपोर्ट कार्डच तयार केलं जाणार आहे. त्यांच्या मताधिक्याचा उमेदवाराला कसा फायदा झाला, याचं मूल्यमापन होणार आहे. विधानसभा निवडणुकांना अजून किमान सहा महिने अवकाश आहे. परंतु लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधीपासूनच मोर्चेबांधणी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, महायुतीतील नऊ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर आणि सातारा मतदारसंघात भाजप उमेदवार देणार आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना छत्रपती संभाजीनगर, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवार घोषित करेल. नाशिकच्या जागेवरुन शिवसेना-राष्ट्रवादी, तर ठाणे आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीवरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र या तिन्ही जागा सेनेच्या हातून निसटण्याची शक्यताच अधिक आहे.
