। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे ब्रिटिशकालीन धरणातील माती अवैधरित्या काढली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेरळ ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. धरणातील मातीचे बेकायदा उत्खनन करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी मनसेचे कर्जत तालुका उपाध्यक्ष मिलिंद मिसाळ, नेरळ शहर अध्यक्ष हेमंत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून गावातील गणेशघाट धरण पात्रातून मोठ्या प्रमाणात सुपीक मातीचे उत्खनन सुरु आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या गावातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नेरळ गावाचे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असताना परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असून गावाच्या आणि जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर केंद्रित करावे, अशी मागणी केली आहे.
याशिवाय नागरिकीकरण आणि शहरीकरण मोठया प्रमाणात होत असताना समशानभूमी दुरुस्त करण्याची मागणी मनसेने केली आहे. तर नेरळ खांडा विभागातून ममदापुर येथे जाणार्या मार्गावर हॉटेल दिव्यादीप येथील चौकाचे नामकरण विठ्ठल रखुमाई चौक असे करण्याची मागणीही त्यांनी केली आहे