| मणिपूर | वृत्तसंस्था |
मणिपूरमधील नोनी जिल्हात सुरु असलेल्या संततधार पावसाने जिरिबाम- इंफाळ रेल्वे-रूळाजवळ भूस्खलन झाले आहे. दुर्घटनास्थळील लष्कराची छावणी असल्याने त्याचा मोठा फळका बसला आहे. लष्कराच्या छावणीजवळ झालेल्या भूस्खलनात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५० हून अधिक जवान बेपत्ता आहेत.आत्तापर्यंत १३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींवर नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळं नदीचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. भारतीय लष्कर आणि आसाम रायफलच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. बेपत्ता झालेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे.
पहाटे ५. ३० वाजेपर्यंत १३ जणांची सुटका करण्यात आली. जखमींवर नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. दरड कोसळल्याने इजई नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. भूस्खलन आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मात्र, बेपत्ता लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत. लष्कराचे हेलिकॉप्टर बचावासाठी सज्ज असून हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहत आहेत. मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी १०७ टेरिटोरियल आर्मीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यानंतर गुरुवारी सकाळी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.