। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बीड प्रकरणात औष्णिक प्रकल्पातून येत असलेल्या राखेच्या व्यवसायामधून खून घडला असल्याचे दिसून आले आहे. निसर्गसौंदर्याने बहरलेल्या व समुद्रकिनारी वसलेल्या अलिबाग तालुक्यातदेखील औद्योगिक कारखान्यांच्या ‘फ्लाय अॅश’चा वापर अमर्यादित सुरू असून, यामुळे जमिनी नापिक वा मृत होणार असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. ही फ्लाय अॅश एका राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादाने तालुकाभर पसरली जात असल्याने अलिबाग तालुका नापिक करणार्या फ्लाय अॅशचा ‘आका’ कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अलिबाग तालुक्यातील मिळकतखारमधील अनधिकृत फ्लाय अॅशचा भराव ‘कृषीवल’ने नागरिकांच्या सहकार्याने हाणून पाडला. त्यावेळीही फ्लाय अॅशचे ट्रक, डंपरची वाहतूक सुरू होती. अखेर नागरिकांनी या डंपरसमोर झोपून आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर या भरावाचे काम तहसीलदार यांनी तपासणी पथक नेमून बंद केले होते. आता निसर्गरम्य मांडवा बंदराजवळील कोळगाव येथील खासगी जमीन मालकांच्या ग.नं. 322, ग.नं. 321 व एका सरकारी गट नंबरवर फ्लाय अॅशचा बेकायदा भराव होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष जिल्हा किनारा व्यवस्थापन समिती, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे कोळगाव येथील रमेश कुंदनमल यांनी केल्या आहेत.
फ्लाय अॅशमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असतो. शासनाची कुठलीही परवानगी न घेता फ्लाय अॅशचा भराव करण्याचे प्रकार अलिबाग तालुक्यात सुरू झाले आहेत. फ्लाय अॅश ही आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. अशी फ्लाय अॅश शेतजमिनीवर टाकणे गुन्हा असताना सर्रास हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
फ्लाय अॅशमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याशिवाय शेतीवरसुद्धा दुरगामी परिणाम झाला आहे. दमा, कॅन्सर, त्वचारोगसारखे गंभीर आजार यामुळे होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात अॅश पसरविणार्यावर तात्काळ कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.
कंपनी प्रशासन अंधारात
याबाबत जेएसडब्ल्यूच्या काही अधिकारी व कर्मचार्यांसोबत चर्चा केली असता याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचे समोर आहे. याशिवाय ही राख कंपनीच्या परवानगीशिवाय चोरुन नेली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचाच अर्थ, कंपनीला न विचारता, त्यांची कोणतीही परवानगी न घेत त्यांनी ठेवलेल्या जागेतून कोणीतरी ही स्लॅग पूर्ण तालुकाभर पसरवित आहे. त्यामुळे या स्लॅगची चोरी नक्की कोण करतंय, हे समोर येणं आवश्यक आहे.