कामोठे शेतकरी कामगार पक्षाचा पुढाकार
| पनवेल | प्रतिनिधी |
देशभरात इंडिया आघाडीची एकजूट होताना दिसत आहे. पनवेल-उरण मतदार संघात देखील 19 पैकी 13 ग्रामपंचायत इंडिया आघाडीची सत्ता आली. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत शेतकरी कामगार पक्षाने इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. शेकापचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. कामोठे शहरातील शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, कामोठे कॉलनी फोरमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने दिवाळी फराळ या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेस जिल्हा प्रमुख सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतीश पाटील, माजी नगरसेवका निर्मला म्हात्रे, प्रमोद भगत, शंकर म्हात्रे, सखाराम पाटील, शिवसेना रायगड प्रवक्त्या सुवर्णा वाळुंज, शिवसेना पदाधिकारी प्रभाकर गोवारी, रामदास गोवारी, संगीता राऊत, संगीता पवार, आम आदमीचे चिमाजी शिंदे, वंचितचे महेंद्र जाधव, कामोठे कॉलोनी फोरमच्या महिला अध्यक्षा जयश्री झा यांनी दिवाळी फराळाचा आनंद लुटला. त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तसेच आपली एकजुट अशीच कायम ठेवण्याचा त्यांनी संकल्प केला. दिवाळीच्या फराळाचा गोडवा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नक्की दिसेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दिवाळी फराळचा आस्वाद शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दरवर्षी घेतला जातो. मात्र यावर्षी आम्ही सर्वच आघाडी आणि सामाजिक संस्थामधील कार्यकर्ते दिवाळी फराळासाठी एकत्र आलो, एकत्र सण साजरे करणे याचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही, असे मत आयोजक अमोल शितोळे यांनी व्यक्त केले.