उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
उन्हाची तीव्रता वाढताच बाटली बंद पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, या पाण्याच्या शुद्धतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ बाटलीतून गार पाणी दिले जात असल्याचे येथील सजग नागरिक सांगत आहेत.
नागरिक जे बाटलीबंद पाणी खरेदी करत आहेत, त्या बाटलीवर पाणी कधी भरले, ते शुद्ध आहे का, ते कधीपर्यंत वापरायचे आहे, याविषयी काहीच उल्लेख नसतो. काही व्यावसायिक वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकत असतात. अनेक नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्याकडून या बाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणीविक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. पाणी विक्रीचा व्यवसाय ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाण्याची शुद्धताही तपासली जात नाही. केवळ पाणी थंड आहे म्हणून ग्राहक ते विकत घेतात. यातून ग्राहकांची लूट होत असून, त्यांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. कोणत्याही हॉटेल, पानटपरीवर आता एक लीटर पाण्याची बाटली जवळपास वीस रुपयांना मिळते. अनेक हॉटेलचालक स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या विकत आहेत. त्यात अनेक शीतपेय निर्मिती कंपन्या ही बाटलीबंद पाण्याची विक्री करताना दिसत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक पाणी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सध्या बहुतेक नागरिक पिण्यासाठी पाणी म्हणून मोठ्या बाटल्या पाण्याच्या मागवत आहेत. 30 रुपयांना एका बाटलीची विक्री केली जात आहे. जर पाणी थंड पाहिजे असेल, तर 40 रुपये आकारले जात आहेत. मात्र, या पाण्याच्या शुद्धतेविषयी कोणतीच माहिती दिली जात नाही. तसेच बाटलीवर त्याचा काही उल्लेख नसतो.
अंकुश पाटील,
नागरिक