डिसेंबरपर्यंत जेट्टीचे काम होणार पुर्ण
| मुरुड/जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड-जंजिरा शहराला प्राचीन इतिहास आहे. अभेद्य असा जंजिरा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र किल्ल्यात शिडाच्या बोटीने गेल्यावर प्रवेशद्वारावर उतरणं व चढणं पर्यटकांसाठी कठीण होतं. समुद्राच्या लाटांचा मारा होत असताना बोट 10 फूटवर जाऊन काही सेकंदात खाली येते. त्यावेळी पर्यटकाला तोल सांभाळत जीव मुठीत घेऊन उतरावे लागत होते. अखेर पर्यटनवाढीसाठी याठिकाणी अद्ययावत जेट्टी उभारण्याच्या कामाला गती मिळाली असून वर्षअखेरीस हे काम पुर्ण होणार असल्याचे मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी सांगितले. त्यामुळे पर्यटकांना जंजिरा किल्ल्यात जाणं सुखकर होणार आहे.
![](http://krushival.in/grygrars/2024/01/janjira-jeti-scaled-e1706184109586-1024x474.jpg)
शासनाने पर्यटकांसाठी 93.56 कोटी खर्चून जेट्टी उभारण्याची मान्यता सप्टेंबर 2022मध्ये दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरवात होत नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर गेल्या 2 महिन्यांपासून जेट्टीच्या कामाला गती मिळाली असून प्रथम 250 मीटर लांबीची बॅकवॉटर वॉल बांधण्याचे काम सुरु आहे. तसेच, 3000 सिमेंटचे ट्रेंटरा ब्लॉक तयार आहेत. मोठ्या दगडाने किल्ल्याच्या मागील बाजूस समुद्रात भिंत बनवण्यात येईल व नंतर त्यावर ट्रेंटरा ब्लॉक लाऊन वॉल 2024 अखेर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी दिली
शासनाच्या पैशांचा अपव्यय आगरदांडा जंगल जेट्टी बनून चार वर्ष झाली. भरती-ओहोटीला समुद्राचे पाणी उलट फिरत असल्याने दिघीला जाणाऱ्या बोटी सध्या खासगी जुन्या जेट्टीला लागत असून नवीन जेट्टी पडून आहे. याचे बांधकामदेखील मेरीटाईम बोर्डाच्या तज्ज्ञ टीमने केले. मग या त्रुटी का राहिल्या? या चारही जेट्टीचे टेंडर अनेकवेळा निघाले. मात्र, जेट्टी निकामी असल्याने कोणीही टेंडर भरले नाही. त्यामुळे पैशाचा अपव्यय होत असून याला जबाबदार कोण, असा प्रश्न मुरुडकरांना पडला आहे. नव्याने होणाऱ्या जंजिरा किल्ल्यातील जेट्टीचे असे होऊ नये, याची मेरीटाईम बोर्डाने काळजी घ्यावी. स्थानिकांना विश्वासात घेऊन जाणकार कोळी बांधवांचा सल्ला घेऊन जेट्टी बांधण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
सध्या पर्यटक किल्ल्यात जातात ते किल्ल्याचे मागील प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असल्याने पुरातत्व विभागाने व तज्ज्ञ मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून समुद्राच्या लाटांची तीव्रता पाहून ही जागा निवडली आहे. पश्चिमेकडील प्रवेशद्वार मोठे असल्याने जेट्टी बनविण्यास सुलभ होईल. तसेच, राजपुरीकडून दिसणाऱ्या किल्ल्याच्या सुंदरतेत कोणतीही बाधा येणार नाही. या जेटीचे बांधकाम मेरीटाईम बोर्डाची तज्ज्ञ टीम करणार आहे. सर्व संभाव्य त्रुटींचा विचार करून जेट्टीचे सुरक्षित व वापण्यास सहज सोपे असे बांधकाम होणार आहे.
सुधीर देवरे, अधिकारी, मेरिटाईम बोर्ड
उन्हाळी सुट्टीत नेहमी मुरुडला येणं होतं. एप्रिलमध्ये समुद्र खवळलेला असल्याने राजपुरीच्या जेट्टीवरून शिडाच्या बोटीने किल्ल्यात उतरताना मोठी कसरत करावी लागते. बोट लाटांसोबत वर-खाली होते. त्यामुळे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उतरणे भितीदायक होते. अनेकदा पर्यटक किल्ला न पाहताचा माघारी जातात. त्यामुळे जेट्टी लवकर होणे गरजेचे आहे. काशीद जेट्टीसारखी ही रखडून देऊ नका. चार वर्षे झाली, तरी त्या जेट्टीचे काम सुरुच आहे.
वंदना खटावकर, पर्यटक, ठाणे