जलपर्णी, सांडपाण्यामुळे उल्हास नदी दूषित

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रशासनाचे दुर्लक्ष, उपाययोजनांची गरज

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातून वाहत जाणार्‍या उल्हास नदीला सध्या जलपर्णी आणि सांडपाण्याचा विळखा बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदी पात्रात पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी जमा झाली आहे. तसेच अनेक भागात नाल्यातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत येत असल्याने नदीतील पाणी दूषित झाल्याचे दिसून आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
कर्जत, नेरळ भागातून वाहणार्‍या उल्हास नदीचा उगम लोणावळा भागातून होतो. डोंगरातील पाणी उल्हास नदीला येऊन मिळते. याच पाण्यावर कर्जत तालुक्यातील अनेक गावांना उल्हास नदीतून पाणी योजना सुरू आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी याच उल्हास नदीचा आधार आहे. परंतु, सध्या उल्हास नदीला जलपर्णी आणि सांडपाण्याचा विळखा बसला आहे. बहुतांश पाणी योजनांना फिल्टर प्लांट नसल्याने पाईपाद्वारे येणारा दूषित पाणी प्यावे लागत असल्याने यात आता अधिकच भर पडली आहे. परिणामी, शेलू, वांगणी तसेच परिसरातील नागरिकांना दुषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.या दूषित पाण्यामुळे आरोग्यावरदेखील परिणाम होणार आहे. त्यामुळे अधिकारी, लोकप्रतिनिधी, तसेच सामाजिक कार्यकर्ते नदी स्वच्छतेसाठीसाठी पुढाकार घेणार का, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहत येत असून, सर्व पाणी दूषित झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, अलीकडच्या काळात नेरळ आणि परिसरात ज्या पद्धतीने गृहसंकुलांचा विस्तार होत आहे, ते पाहता पुढील काळात सांडपाण्याचे नियोजन न झाल्यास ते सर्व नदी पात्रात येईल आणि ही धोक्याची घंटा वेळीच ओळखणे आवश्यक आहे. उल्हासनदी हे पिण्याचे मुख्य स्त्रोत असून, सर्व गृहसंकुलांना सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करणे गरजेचे आहे आणि त्यांची पूर्तता जर विकासकाने केली नाही, तर अशा प्रकल्पांचे परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई करावी. – केशव तरे, उल्हास नदी संवर्धन समूह, नेरळ परिसर

Exit mobile version