। चिरनेर । वार्ताहर ।
नवसाला पावणारी आगर्यांची आराध्य दैवत असणारी देवी म्हणून,जरी मरी देवीला आगरी समाजात वेगळे स्थान आहे. या देवीला आगरी समाजात ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. जरी मरी आईचे स्थान, प्राचीनता आणि तिचे लोभसवाणे रूप यामुळे देवीचे महात्म्य काही वेगळेच आहे. या जागृत जरीमरी मातेचा महिमा फार मोठा आहे. चिरनेर गावात जरीमरी मातेचे एक स्वयंभू स्थान आहे.
ही जरीमरी आई गावाच्या आरोग्याची रक्षक आहे. तिचं स्थान चिरनेर गावाच्या मध्यभागी आहे. तर चिरनेर गावाच्या वेशीवरचा म्हणजे दंडावरच्या माळरानावरचा बापुजी देव हा या जरीमरी आईचा सख्खा भाऊ आहे असे मानले जाते. हा देव संकट विमोचक म्हणजे गावावर येणार्या संकटाला थोपवून धरणारा जागृत देव आहे. चिरनेर गावापासून अवघ्या दीड दोन किलोमीटर अंतरावरच्या वेशीवर असणारा हा देव एकेकाळी पांढर्याशुभ्र घोड्यावर बसून दर महिन्याच्या मंगळवारी रात्री चिरनेर गावाच्या शिवारातील खलाटीत फेरफटका मारून, आपल्या गावातील जरीमरी बहिणीला भेटण्यासाठी येत असल्याचा दृष्टांत देवीचे एकेकाळचे पुजारी खंडू पाटील यांनी अनेक वेळा अनुभवला असल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी आजही सांगतात.
या जरीमरी देवीची यात्रा चैत्र वैद्य नवमीला असते. याच दिवशी बापूजी देवाची आणि चिरनेरच्या रांजणी खालच्या शेतावरच्या देवाची यात्राही या दिवशी साजरी केली जाते .या देवतांना कोंबडा नारळ यांचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी विवाहित महिला देवीची खणा नारळाने श्रद्धेने ओटी भरतात.या यात्रेनिमित्ताने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात .जरी मरी आईच्या देवळाजवळ उंच काठी उभारण्याचा मान आजही मोकल कुटुंबियांकडे आहे.या परिवारातर्फे देवीचा अभिषेक विधिवत पूजन करून काठी उभारतात तर पाटील कुटुंबीयांकडे पूजेचा मान असून, बाबू पाटील हे देवीचे खरे पुजारी होते .ते आणि त्यांचा मुलगा भास्कर पाटील हे हयात नसल्यामुळे सध्या या पूजेचा मान त्यांचे वारसदार नातू समाधान पाटील यांच्याकडे आला आहे. ते नित्य पूजा अर्चा करून देवीला नैवेद्य दाखवत असतात. एकेकाळी गावातील कर्मठ लोकांनी देवीची परीक्षा घेण्याचे ठरविले .त्यासाठी त्यांनी होम कुंड पेटविला होता.
या होम कुंडात जरी मरी आईच्या अंगात वारे असणार्या कातलपाड्यातील सुकी भक्तीनीला या होम कुंडात उडी घेण्यासाठी सांगून, तिच्या अंगात खेळत असणार्या जरीमरी आईचे खरे रूप सिद्ध करण्यास सांगितले .अशावेळी सुकी भक्तीनीने मागेपुढे न बघता देवीचे स्मरण करून, तिने पेटत्या होमकुंडात उडी घेतली आणि संपूर्ण होम कुंड विझवून दाखविला .यावेळी तिच्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचली नाही. यावरून या जागृत देवीचे स्थान, प्राचीनता आणि महात्म्य किती महान आहे, हे लक्षात येते .हे रौद्ररूप पाहून या कर्मठ लोकांनी सुकी भक्तीनरुपी देवीचे पाय धरले ही कथा नाही तर हे त्रिवार सत्य आहे.