दरवर्षी दीड-दोन फूट पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास
। उरण । प्रतिनिधी ।
पावसाळा सुरू झाला की उरण तालुक्यातील जासई-दास्तान फाटा दरम्यानचा सर्व्हिस रोड पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. दरवर्षी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडला रस्त्याऐवजी अक्षरशः तलावाचे स्वरूप आले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. रस्ता वाहतुकीसाठी बांधला की पावसाळ्यात तलाव करण्यासाठी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जेएनपीए आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) यांच्या माध्यमातून जासई शंकर मंदिर ते दास्तान फाटा दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात आला असून, स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीसाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड तयार करण्यात आले आहेत. मात्र, या सर्व्हिस रोडचे नियोजन आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था पाहता संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात या सर्व्हिस रोडवर तब्बल दीड ते दोन फूट पाणी साचत असल्याने दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. पाण्याची खोली आणि रस्त्याची वास्तविक स्थिती लक्षात न आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा पाण्यातून वाहन नेल्याने वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरते आणि वाहने बंद पडतात. परिणामी वाहनचालकांना वाहन दुरुस्तीचा हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे सर्व्हिस रोडची उंची कमी असून, रस्त्याच्या समोरील यार्ड आणि गॅरेजची उंची अधिक असल्याने पावसाचे पाणी सर्व्हिस रोडवरच साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही तासांच्या पावसानंतर संपूर्ण रस्ता जलमय होऊन वाहतुकीचा बोजवारा उडतो.
स्थानिक नागरिकांच्या मते, सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाला आहे. त्यातच रस्त्यालगत बांधण्यात आलेली गटारे गाळ, माती आणि कचऱ्याने तुंबल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच उरलेला नाही. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. गटारे आहेत, पण पाणी वाहत नाही; रस्ता आहे, पण पावसात रस्ता दिसत नाही! मग हे कसले नियोजन आणि कसला विकास, असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.
दरवर्षी पावसाळा आला की याच सर्व्हिस रोडवर पाणी साचते. वाहनचालकांचे हाल होतात, वाहने बंद पडतात, आर्थिक नुकसान होते; मात्र पावसाळा संपल्यानंतर हा प्रश्न पुन्हा फाईलमध्ये गाडला जातो. दरवर्षी तीच समस्या आणि दरवर्षी त्याच आश्वासनांची पुनरावृत्ती; हा प्रशासनाचा कारभार आहे की नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा? असा सवाल उपस्थित होत आहे.
एनएचएआय, जेएनपीए आणि संबंधित यंत्रणांनी आता केवळ पाहणीचा फार्स न करता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. सर्व्हिस रोडची उंची, रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा भराव, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, गटारांची क्षमता आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था यांचा तातडीने तांत्रिक आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.
सर्वप्रथम तुंबलेली गटारे युद्धपातळीवर साफ करावीत. गाळ आणि कचरा काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा. ज्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा निचरा बंद झाला आहे, तेथील अडथळे दूर करावेत. आवश्यक असल्यास अतिरिक्त ड्रेनेज व्यवस्था उभारावी आणि रस्त्याची उंची वाढवून पाणी साचणार नाही याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. पावसाळ्यात नागरिकांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा आणि प्रशासनाने केवळ पाहणी करून मोकळे व्हायचे, हे आता चालणार नाही! सर्व्हिस रोडवरील पाणी साचण्याची समस्या ही केवळ गैरसोयीची बाब नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि वाहनचालकांच्या आर्थिक नुकसानीशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, दुचाकीस्वार आणि लहान-मोठी वाहने ये-जा करतात. त्यामुळे पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्याऐवजी त्यापूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
संबंधित प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून सर्व्हिस रोडवरील पाणी निचऱ्याची व्यवस्था सुरळीत करावी, तुंबलेली गटारे साफ करावीत आणि भविष्यात पाणी साचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्ता बांधताना पाण्याचा निचरा करण्याचे साधे गणितही सुटले नसेल, तर या नियोजनाची जबाबदारी कोणाची? याचे उत्तर एनएचएआय आणि संबंधित यंत्रणांनी जनतेला देण्याची वेळ आली आहे.






