| नेरळ । वार्ताहर ।
स्वातंत्र्य लढ्याचा कर्जतला मोठा इतिहास : वसंत कोळंबे तालुक्याच्या लढाऊ बाण्याची नोंद ब्रिटिश सरकारला इंग्लंडमध्ये घायवी लागली होती. त्यामुळे तरुण वर्गाने हुतात्मा भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी केले. नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयात देशाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त विशेष सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहात शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे योगदान याबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
1942 च्या चलेजाव आंदोलनाविषयी विद्यार्थी वर्गाशी संवाद साधताना माथेरानमधील भाऊसाहेब राऊत आणि विठ्ठलराव कोतवाल यांनी कर्जत तालुक्यातील तरुणांना एकत्र करून देशाच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले या माहिती सांगितली. तसेच गोमाजी पाटील, राघो भगत हि मंडळी सोबत घेऊन क्रांतिकारक यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा सुरु केला असे सांगतानाच या लढ्याने विजेचे खांब कोसळविणे, टेलिफोनच्या तारा तोंडाने, ट्रेन बंद करणे आदी क्रांतिकारी कामे करून ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडले होते. म्हणून तालुक्याचे योगदान देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नोंद झाली आहे. इतिहास कोणीही विसरू शकत नाही आणि त्यामुळे तरुण वर्गाने आपले आदर्श हे हुतात्मा भाई कोतवाल यांना ठेवले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. या लढ्यात गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील असे पिता पुत्र लढले आणि हिराजी गोमाजी पाटील हा पुत्र देशासाठी शाहिद झाला असे उदाहरण देशाच्या इतिहासात नाही. त्यामुळे या दोन्ही हुतात्म्यांचा आदर्श आपले असले पाहिजेत असे सांगून दरवर्षी या महाविद्यालयातील विद्यार्थी त्या दोन्ही हुतात्म्यांचे बलिदान जिथे झाले तिथे सिद्धगड येथे जायला हवे अशी सूचना केली. यावेळी विवेक पोतदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नंदकुमार इंगळे, प्रा.सागर मोहिते, सोनम गुप्ता आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल घरत यांनी केले.