| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोलीतील ताकई-साजगाव येथील प्रसिद्ध बोंबल्या विठोबा यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. कार्तिकी एकादशीपासून पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत सावळ्या विठोबाच्या दर्शनासाठी रायगड, ठाणे, मुंबई, पुण्यातून लाखो भाविक येत असतात. तसेच या यात्रेनंतरच खऱ्या अर्थाने रायगड तसेच संपूर्ण कोकणातील जत्रांच्या हंगामाला सुरुवात होत असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणाची चाके गतीमान होतात.
खोपोली-पेण रस्त्यावरील धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या ताकईच्या विठ्ठल मंदिरातील यात्रेस कार्तिकी एकादशीपासून सलग पंधरा दिवस यात्रा भरते. यावेळी कपडे, भांडी, घोंगडी, मिठाई व सुक्या मासळीचा येथे बाजार भरतो. त्याचबरोबर आकाश पाळण्यांसह मनोरंजनासाठी असलेले विविध प्रकारांमुळे पंधरा दिवस होणाऱ्या कोट्यवधींची उलाढालीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. यावेळी एकादशीच्या दिवशी परिसरातून अनेक दिंड्या येथील विठ्ठल मंदिरात येतात. तसेच ग्यानबा तुकारामाच्या अखंडपणे सुरु असलेल्या जयघोषामुळे वातावरण भक्तीमय होते. यंदाही मंदिर परिसरातील 22 ते 25 एकर जागेतील यात्रेची संपूर्ण तयारी झाली असून ताकई देवस्थान समिती व खोपोली नगरपालिकेकडून संयुक्तरित्या यात्रेचे नियोजन केले जात आहे. तसेच यात्रेकरूंसाठी बसची खास व्यवस्था केली गेली आहे.
बोंबल्या विठोबाची रंजक कथा संत शिरोमणी तुकाराम महाराज मिरचीचा व्यापार करण्यासाठी या ठिकाणी आले होते. मिरच्या घेतल्यानंतर त्यांची रक्कम त्यांना मिळाली नाही, अखेर तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या नावाने बोंबा मारल्या होत्या. तेव्हा विठ्ठलाने सेवकाच्या रूपात येऊन सर्व पैसे वसुल करून दिल्याची आख्यायिका येथील ग्रामस्थ सांगतात.
लाखोंची आर्थिक उलाढाल साजगाव यात्रेतील जिलेबीची चव घेण्यासाठी अनेक खवय्ये यात्रेत गर्दी करतात. त्याचबरोबर थंडीत ऊब देणारे स्वेटर, ब्लँकेट, घोंगड्या व चादरी याचाही मोठा व्यापार या ठिकाणी होतो. अलिबाग व पेण येथून आलेले कोळीबांधव लाखो रुपयांची सुकी-मासळी विक्री करतात. घाटमाथ्यासह विविध ठिकाणाहून सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी गर्दी होते. मनोरंजनाचे विविध कार्यक्रम त्याचबरोबर बच्चे कंपनीसाठी पाळणे व अन्य साधने परिसरातील नागरिकांसाठी वेगळा आनंद घेऊन येत असतात. त्यामुळेच अनेकजण यात्रेची आतुरतेने वाट पाहतात.