कांदळवनांवरील बेकायदा भरावांविरोधात कोळी समाज आक्रमक

पोलीसांत तक्रार दाखल
। मुरूड । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील ताराबंदर कोलमांडला येथील कांदळवनांवरील अनधिकृत भरावाविरोधात महादेव कोळी समाज ताराबंदर यांनी पोलीसांत 10 मे व 14 मे रोजी रितसर तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी दि.20 मे रोजी बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ताराबंदर खाडीलगत चालू असलेल्या अनधिकृत भराव तसेच कांदळवनाच्या कत्तली विरोधात ग्रामस्थ मंडळ ताराबंदर यांनी ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन दिले तसेच कार्यवाहीची मागणी केली. यावेळी सरपंच चेतन जावसेन, ग्रामविकास अधिकारी गाडेकर,ताराबंदर कोळी समाज अध्यक्ष वैभव भोईर, भालचंद्र वर्सोलकर, कृष्णा परदेशी, प्रशांत भोईर, राजेश तरे, प्रतिक कणगी व इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

ग्रामपंचायत बोर्ली पंचक्रोशीतील कोलमांडला ताराबंदर येथील ग्रामस्थांनी पोलीसांत आता पर्यंत अनेकवेळी तक्रार अर्ज दिले आहेत. यामध्ये बोर्ली – ताराबंदर खडतील, समुद्रकिनारी स्थित असलेल्या शासकिय कांदळवनात काही समाजकंटकांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर कांदळवनात माती, दगड, मुरूम इ.चा बेकायदेशीरपणे भराव टाकून कांदळवनाच्या झाडांची कत्तल करित आहेत. सदर बेकायदेशीर काम त्वरित बंद करावे. कांदळवनाचे संवर्धन करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. या बेकायदेशीर स्थगिती आणावी तसेच या गैरप्रकरणी ग्रुप ग्रामपंचायन बोर्ली, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, वन विभाग, कांदळवन जिल्हाधिकारी रायगड यांनी कार्यवाही करावी अशी विनंती महादेव कोळी समाजाने केली आहे.

तक्रार पत्रात नमूद केल्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मौजे कोलमांडला गट क्रमांक 49 येथे हे सर्व अनधिकृत कामे केली जात आहेत . सदर तक्रार दिल्याच्या दिवशी म्हणजेच दि .10 / 05 / 2022 व दि . 11/05/2022 या दोन दिवसांत शेकडो झाडांची कत्तल झाली आहे तसेच अतिक्रमणही चालूच आहे . यामुळे ग्रामस्थांमध्ये आक्रोशाचे वातावरण आहे. गावक-यांचा आक्रोश लक्षात घेता हे अनधिकृत कामे अशीच चालू राहिली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून आपण त्वरित या प्रकरणात लक्ष देऊन संबंधित दोषींवर कार्यवाही करावी अशी विनंतीही रेवदंडा पोलीसांना करण्यांत आली आहे.

Exit mobile version