कर्नाटकामध्ये महिनाभरात निवडणुका होत आहेत. एकूण प्रचार हिंदू-मुस्लिम, हिजाब इत्यादी मुद्द्यांभोवती फिरत ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पण आता तो आरक्षण, विकास इत्यादी मुद्द्यांकडे जाऊ लागला आहे. त्यातूनच नंदिनी विरुध्द अमूल असा वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रात जसा महानंद आहे तसा नंदिनी ही कर्नाटक दूध महासंघाचा ब्रँड आहे. राज्यातील तब्बल चौदा हजार सहकारी सोसायट्या तिच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. बावीस हजार खेड्यांमधून सुमारे 84 लाख किलो दूध रोज गोळा केले जाते आणि ते नंदिनी या ब्रँडने विकले जाते. चोवीस लाख दूध उत्पादकांना त्याचा फायदा होत असतो. मुख्य म्हणजे हा सर्व व्यवहार सरकारी पाठिंब्याने व अनुदानाने चालला असला तरी तो अजिबात तोट्याचा नाही. कर्नाटकात चौदा मोठे जिल्हा दूध संघ असून ते सर्व फायद्यात आहेत. खुद्द नंदिनीची उलाढाल सुमारे 24 हजार कोटी रुपयांची आहे. दक्षिणेकडील राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही तिने आता शिरकाव सुरू केला आहे. नंदिनीच्या याच उद्योगक्षेत्रात घुसण्याची अमूलची इच्छा आहे. त्या दृष्टीने त्यांनी केंद्र सरकारमार्फत डावपेच लढवायला सुरुवात केली. अमूल हा नरेंद्र मोदींच्या गुजरातेतील आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. गुजरात दूध उत्पादक सहकारी संस्था ही या अमूलची मालक. अगदी परवा-परवापर्यंत, मोदींच्या आणि भाजपच्या दादागिरीला तोंड देऊन ही संस्था काँग्रेसी नेत्यांनी आपल्या ताब्यात ठेवली होती. पण नुकताच तिच्यावर भाजपने कबजा केला. गृहमंत्री अमित शाह हे आता सहकार क्षेत्रात विशेष रस घेऊ लागल्यानंतर हे सर्व घडले हा योगायोग नसावा. शाह यांनीच कर्नाटकातील नंदिनी विरुध्द अमूल या वादाला पहिले निमित्त पुरवले. डिसेंबरमध्ये एका प्रचारसभेमध्ये बोलताना त्यांनी अमूल आणि नंदिनी हे दोघे मिळून कर्नाटकाच्या प्रत्येक गावात एक डेअरी स्थापन करतील अशी घोषणा केली. त्यानंतर, गेल्या आठवड्यात अमूलने बंगलोरमध्ये आपले दूध व दही विकायला सुरुवात केली आणि एकदम मोहोळ उठले. अमूलला आपला निर्णय स्थगित करावा लागला.
दूध आणि मलई
अमूलची उलाढाल नंदिनीच्या जवळपास तिप्पट आहे. अमूलला बटर, चीज, आईस्क्रिम विकण्यात अधिक रस आहे. खरा फायदा त्यातच आहे. नंदिनीवर कबजा करावा, नंतर तिने केवळ दूध विकावे आणि अमूल इतर उत्पादने विकेल असा हा व्यूह आहे. पण नंदिनी हा कन्नड लोकांच्या अभिमानाचा विषय आहे. अगदी आरंभापासून कन्नड चित्रसृष्टीतील अमिताभ बच्चन मानले जाणारे डॉ. राजकुमार यांच्यासारखे अभिनेते नंदिनीसाठी जाहिरात करीत आलेले आहेत. त्यामुळे तिला अमूलने गिळंकृत करावे ही कल्पना त्यांना सहन होण्यासारखी नाही. आता कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अशा विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही असा खुलासा केला असला तरी लोक अजूनही साशंक आहेत. राज्यातल्या म्हैसूर विभागातल्या वोक्कलिगांचे या व्यवसायावर नियंत्रण आहे. एरवीदेखील, सर्वसाधारणपणे वोक्कलिग समाज माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दलाचा पाठिंबादाता असतो. आता तर तो भाजपच्या अधिकच विरोधात जाण्याची शक्यता आहे. यातील राजकारण बाजूला ठेवून निव्वळ व्यावसायिक विचार केला तर आपल्या राज्याच्या सहकारी संस्थेच्या मागे जनता कशा रीतीने उभी राहते याचे हे चांगले उदाहरण आहे. महाराष्ट्रात महानंद या नंदिनीसारख्याच संस्थेचे व ब्रँडचे सध्या जे काही धिंडवडे निघत आहेत त्या पार्श्वभूमीवर तर हे विशेष उठून दिसणारे आहे. महानंद आता दिवाळ्यात निघाली असून अमूलने सहारा दिला तरच तिला काही गती आहे अशी स्थिती उद्भवली आहे. अमूल आणि तिचे संस्थापक डॉ. कुरियन यांचा पराक्रम मोठाच आहे. दूध व्यवसायात त्यांनी निःसंशय क्रांती घडवली. महाराष्ट्रातील सहकारी दूध संस्थांनीही अमूलच्या तोडीचे काम केले होते.
महानंदचे अपयश
एक काळ असा होता की, अमूलच्या ब्रँडने इतरत्र मोठे मैदान मारले तरी महाराष्ट्रात त्याला फारसा शिरकाव करता येत नव्हता. मुंबईतील दुधाचे मार्केट नेहमीच प्रचंड आहे. या शहरात आज एक कोटी लिटर दूध वा दुधाचे पदार्थ खपतात. पूर्वी आरे डेअरी ही गरज भागवत असे. नंतर राज्यभरातील सहकारी दूध संस्थांचा महासंघ निर्माण करून त्यांचा महानंद हा ब्रँड तयार करण्यात आला. पण स्थानिक दूध संघ राजकारण्यांच्या मालकीचे असल्याने त्यांना चाप लावणे महानंदला शक्य झाले नाही. या संघांनी महानंदला ठराविक व नियमित दूध पुरवणे अपेक्षित होते. ते घडले नाही. शिवाय प्रचंड कामगार भरती इत्यादींमुळे महानंदचा दूध प्रक्रिया खर्च पाच-सहा पट झाला. आज महानंदला शेकडो कोटींचा तोटा असून एनडीडीबीने तो चालवला तरच टिकू शकेल अशी स्थिती आहे. दरम्यानच्या काळात अमूलने केवळ मुंबईतच नव्हे तर राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसंडी मारली आहे. गुजरातने महाराष्ट्राचा सहकारी क्षेत्रात पराभव करावा यापेक्षा दुर्दैव काय असेल? नंदिनीचे उदाहरण या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे आहे. आयटी उद्योगामुळे बंगलोर हे श्रीमंत शहर आहे. आज तेथील दुधाची सत्तर टक्के बाजारपेठ नंदिनीकडे आहे. मुख्य म्हणजे प्रक्रिया खर्चावर नंदिनीने कमालीचे नियंत्रण ठेवलेले असल्याने तिच्या दुधाचा दर केवळ 39 रुपये लिटर आहे. अमूलचा हाच दर 57 रुपये आहे. अमूलचा पसारा प्रचंड मोठा झाला असून जाहिरातीवरही बराच खर्च होत असतो. त्याचा हा परिणाम आहे. एकेकाळी नेस्लेसारख्या परकीय कंपन्यांशी अमूलने मोठा लढा दिला. आता नेस्लेची जागा अमूलने घेतली आहे आणि नंदिनी वगैरेंनी आपले पुरवठादार वा विक्रेते म्हणून वावरावे असे त्याला वाटते. नंदिनीसारख्या संस्था त्याविरुध्द लढत आहेत. महानंदनेही असेच लढायला हवे होते. पण ते घडले नाही. राजकारणापायी या संस्थेची वाट लागली. त्या पार्श्वभूमीवर नंदिनीचे यश आणि तिला असलेला कन्नडिगांचा पाठिंबा हा उठून दिसणारा आहे. नंदिनीसारख्या यशकथा वाढायला हव्यात.