मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन. ते कायम थोडीच मुख्यमंत्री राहणार आहेत! अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजकारणामध्ये आहोत. या घटनेला आठवडा पूर्ण होत नाही तोवर शिवसेनेच्या नेत्यांवर सक्तवसुली संचालनालय या केंद्राच्या आवडत्या खात्यातर्फे कारवाई सुरू झाली आहे. नारायण राणे यांना शह देण्यासाठी उचललेल्या अटकेच्या पावलाला केंद्राच्या वतीने काटशह दिला जाईल अशी अटकळ होतीच. म्हणजे हे इतके ठरवून होत आहे की त्यात आश्चर्याचा भावही हरवून गेला आहे. म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आवडीचा शब्द वापरायचा म्हणजे आप क्रॉनोलॉजी समझीये. घटनाक्रम समजून घ्या असे त्यांना देशातील आपल्या हक्कासाठी, केंद्राच्या घटनाविरोधी कायद्यांच्या अंमलबजावणीच्या विरोधात आंदोलन करणार्या नागरिकांना देशद्रोही ठरविण्यासाठी क्रॉनॉलॉजी म्हणजे घटनाक्रम समजून घ्या असे ते म्हणत. आता ज्या ठिकाणी आपले सरकार नाही ते सगळे विरोधक आणि भ्रष्ट आणि त्यांनी जर भाजपशी जुळते घेऊन सत्ता मिळू दिली की सगळे शुद्ध असा भाजपाचा साधा व्यापारी हिशोब आहे. त्यानुसार हा शह काटशहाचा कलगीतुरा सुरू झाला आहे आणि तो अजून काही काळ चालेल. वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी सकाळी छापे टाकले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला. किरीट सोमय्या असे अचानक मोठे घोटाळे बाहेर काढण्यासाठी उगवतात आणि आपल्या पक्षाचे सरकार आल्यावर गायब होतात. यावर भावना गवळी यांनी ही केंद्र सरकारकडून होत असलेली मुस्कटदाबी असून भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घोटाळ्याची चौकशीही करू अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनाही सक्तवसुली विभागाने नोटीस बजावली आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. केंद्राने जर सक्तवसुलीचा ससेमिरा मागे लावला तर ज्यांना नोटिसा येतील त्यात आघाडीवर असलेल्या नेत्यांत त्यांचे नाव होते. त्यानंतर त्यांचे निकटवर्तीय व नागपूर ग्रामीणचे प्रभारी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या नागपूर तसेच पुण्याच्या घरी छापे टाकले गेले. हे अधिकारी परब यांच्या जवळचे असल्याने ही कारवाई झाली असा समज आहे. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी केली आणि अनिल देशमुख व अनिल परब यांना तुरूंगात जावे लागेल असा दावा केला. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जात असल्याने हा थेट ठाकरे यांना संदेश आहे असे म्हणायला हरकत नाही. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी याला उत्तर देताना भाजपावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात करण्यात येणारी कारवाई राजकीय सूडबुद्धीने व राजकीय हेतूने असल्याचे म्हटले आहे. ज्या पद्धतीने भाजपाचे लोक मागणी करताच कारवाई होत आहे, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, अशी क्रॉनॉलॉजी त्यांनीही स्पष्ट केली. शिवसेनेचे संजय राऊत यांनी आपल्या शैलीत, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अशी सूचक तसेच नारायण राणे यांनी अटकेनंतर जशी काटशहाची भाषा केली, त्या भाषेत इशारेवजा प्रतिक्रिया दिली आहे. गेले अनेक महिने शिवसेनेला वेगळे पाडून, सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी जंग जंग पछाडूनही भाजपला यश आले नाही. त्यांनी अजूनही ठाकरे सरकारला कोरोनाच्या प्रकरणी, मंदिरांच्या प्रकरणी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. मात्र त्यातही यश मिळत नाही. आता सगळ्या शक्यता संपल्याने केवळ सूड म्हणून नारायण राणे यांच्या निमित्ताने सरकारला धडा शिकवण्याचे आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या सत्तेचा गैरवापर या केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत करण्याचे केंद्राने ठरवलेले दिसते. याचा अर्थ सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत असे नाही. एकेकाळी हे दोघेही एका ताटात जेवत होते, हे लक्षात घेता राजकारणात कोणी कोणाचा नसतो; कायम शत्रू नसतो आणि कायम मित्रही नसतो, याची पुन्हा एकदा प्रचिती या शह काटशहाच्या कलगीतुर्याच्या माध्यमातून जनतेला येत आहे.